राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने कोल्हापुरातील राजकीय समीकरणं बदलायला सुरूवात झाली आहे. हसन मुश्रीफ महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री झाल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगेंची चांगलीच गोची झालीय. समरजित घाटगे भाजप सोडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगेंनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. किरीट सोमय्या परवडले मात्र मी परवडणार नाही म्हणत घाटगेंनी मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. ईडीच्या कारवाईने संकटात सापडलेल्या मुश्रीफ यांना साखर कारखान्याच्या शेअर्सच्या मुद्यावरून घाटगेंनी कोंडीत पकडलं होतं. त्यातच हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेवर छापे पडल्याने राजकीय बदनामी करण्यात घाटगे यशस्वी झाले होते.
2019 ला घाटगेंनी मुश्रीफांना कडवी झुंज दिल्यामुळे आगामी विधानसभा याच मुद्यावर जिंकणं घाटगेंना सोपं होतं. मात्र आता राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आता हसन मुश्रीफ यांच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांचीही अडचण होणार आहे.
जिल्ह्यातल्या बदललेल्या समीकरणांमुळे समरजित घाटगे इतर कोणत्याही मार्गावर जाण्याऐवजी स्वत:चा मार्ग निवडतील असा अंदाज वर्तवला जातोय. भाजप या वादावर तोडगा काढण्यासाठी लोकसभेला हसन मुश्रीफ आणि विधानसभेसाठी समरजित घाटगे अशी विभागणी करून राजकारण सोपं करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यासाठी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची मनधरणी करावी लागणार आहे.