अखेर देशमुखांना मार्ग मिळाला ते पुन्हा एकत्र येणार…!, पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही ठरला

0

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकांआधी भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत आमदारकीचा राजीनामा देणारे नेते आशिष देशमुख यांच्याबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आशिष देशमुख हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघातून निवडून आले होते. पण आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीका करत आमदारकी आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण आता पुन्हा पाच वर्षांनी ते भाजपात घरवापसी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने म. ज्योतिबा फुले यांचा १९९ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

आशिष देशमुख हे येत्या 18 जूनला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर ते आता भाजपात प्रवेश करणार आहेत. आशिष देशमुख हे भाजपच्या तिकीटावर काटोल किंवा सावनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

आशिष देशमुख यांचं काँग्रेसमधून निलंबन

आशिष देशमुख यांचं पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसमधून निलंबन झालं आहे. काँग्रेसमधून निलंबन झाल्यानंतर आशिष देशमुख यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर ते आता पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. देशमुख हे आधी भाजपातच होते. त्यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक ही भाजपच्या तिकीटावर लढवली होती. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

अधिक वाचा  शिवडी परेल परिसरातील सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

गेल्या पाच वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये आहेत. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्यादेखील होत्या चर्चा

विशेष म्हणजे आशिष देशमुख भाजपात प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यांनी पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची देखील माहिती समोर आली होती. पण त्यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही.

अधिक वाचा  महाराष्ट्रात आमदारकीच्या या 17 जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा! या एका नियमाने बदलली समीकरण