देशासह राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. काही भागात उष्णतेची लाट आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत 31 मेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे. तर, राज्यातील काही शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. आता नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत पाऊस अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे.






राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तर दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या काही भागात काल पावसाने हजेरी लावली होती. हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह अन्य काही भागांमध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारा आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासुन काहीसा दिलासा मिळाला आहे.
तर दक्षिण भारतातील काही भागातही पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे. काही भागांत अवकाळी मुसळधार बरसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.











