महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे ठामपणे राजकीय विश्लेषकांनाही सांगना सध्याच्या परिस्थितीत कठीण आहे.विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये जाणार या चर्चांना पूर्णविराम लागल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातील महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याची बातमी समोर आली. वाय बी चव्हाण सेंटर येथे ही भेट झाल्याचं कळत आहे.






राज्याच्या राजकारणात लवकरच दोन मोठे भूकंप होतील असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळ अनेक चर्चांना सुरुवात झाली होती. पवार आणि आंबेडकरांच्या या भेटीनंतर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये वंचितचा समावेश होणार का? वंचित महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट झाली तर महाविकास आघाडीत वंचितचे स्थान कितवे असेल? वंचित महाविकास आघाडीचा चौथा स्तंभ असेल का? अशा एक ना अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.
यापूर्वी कित्येकदा प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय.











