वारजे वाहतूक कोंडी : लोकप्रतिनिधींकडून सर्वसामान्यांची थट्टा; स्वमालकीच्या संपत्तींना अभय? विकासकामांचे ढोल, श्रेयवादाचे फलक

0

वारजे परिसरातील प्रमुख रस्त्यांवर रस्ता रुंदीकरण करण्याच्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्त्यांची दुरावस्था, अर्धवट कामे, चिखल, धूळ, खड्डे, अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. मात्र विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी उभारण्यात आलेले फलक मात्र ठिकठिकाणी झळकत असल्याचे चित्र आहे. वारजे माळवाडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक जनसेवा रस्त्यावर उतरण्याची भाषा करत असताना आज पुणे महापालिकेची निवडणूक होऊन सात महिन्याचा कालावधी गेला तरीही एक ‘स्क्वेअर फुट’ही काम न झाल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वारजे परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदाई करून कामे सुरू करण्यात आली आहेत. वारजे माळवाडी भागातील नागरिकांनी प्रथमच सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाला भरभरून यश देत चारही ‘नगरसेवक’ विजयी करण्याचे काम केले. मागील दहा वर्षापासून सत्ता नसल्याचे कारण सांगत या भागातील लोकप्रतिनिधींनी विकास कामावर होत नसल्याची कारणे दिली होती; परंतु आत्ता त्याच लोकप्रतिनिधींना सत्तेतील पद मिळाले असली तरीही वारजेगारांच्या नशिबी मात्र समस्यांचा डोंगर कायम आहे. काही ठिकाणी खडी टाकून कामे अर्धवट सोडण्यात आल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून पावसामुळे रस्त्यांवर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

अधिक वाचा  कोथरुड भेळ विक्रेत्याच्या मुलीचे एअर इंडियामध्ये इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार; ना. चंद्रकांतदादांची मदत मोलाची ठरली

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या खासगी वाहनांवर, अनधिकृत पार्किंगवर आणि अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने रस्ते आणखी अरुंद झाले आहेत. वारजे बाह्यवळण मार्गालगत असलेल्या सेवा रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी कायम आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी आज सत्तेच्या खुर्चीवर बसले असले तरीही समस्या मात्र आजही कायम आहेत. परिसरातील अतिक्रमणित व अपूर्ण संपादित जागा स्थानिक प्रभावशाली व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधींशी संबंधित असल्याने पुणे महापालिका प्रशासन या मालमत्तांवर कारवाई करणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्तेतील लोकप्रतिनिधींचे संबंधित जागा मालक आणि स्वमालकी असे दुहेरी हित सबंध असल्यामुळे पुणे महापालिकेच्या वतीने संबंधितांवरील अतिक्रमण कारवाई टाळली जात असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. त्यामुळे “सामान्यांसाठी नियम आणि प्रभावशालींसाठी सूट का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

अधिक वाचा  अभिजीत दिपकेंचा मोठा विजय अखेर सरकार झुकलं; सरकार अलर्ट मोडमध्ये सर्वात मोठा निर्णय 12 500 कोटी मंजूरही केले

वारजे माळवाडी परिसरामध्ये सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, रुग्णवाहिका आणि व्यावसायिकांना दररोज वेळेचा मोठा फटका बसत आहे. शिवण उत्तम नगर कोंडवे धावडे परिसराकडे जाण्यासाठी सुद्धा हा एकमेव रस्ता असल्यामुळे मुख्य एनडीए रस्ता व दोन्ही सेवा रस्ते सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे नागरिक सांगतात.

स्थानिक नागरिकांची मागणी आहे की, परिसरातील रखडलेली विकासकामे वेळेत पूर्ण करावीत. पुणे महापालिकेच्या वतीने रस्त्यांवरील खड्डे आणि चिखल तातडीने हटवावा. मुख्य रस्ता व सेवा रस्तालगत अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणांवर निष्पक्ष कारवाई करावी. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. सध्या सुरू असलेल्या कामांच्या दर्जाची स्वतंत्र चौकशी करावी. दरम्यान, विकासकामांचा गाजावाजा आणि श्रेयवादाचे फलक लावण्यापेक्षा प्रत्यक्षात नागरिकांना चांगले रस्ते, सुरक्षित वाहतूक आणि नियोजनबद्ध सुविधा मिळणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना वारजेकर व्यक्त करत आहेत.

अधिक वाचा  भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवरची टीका जिव्हारी स यादी निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी बिडकर यांचेही खुले पत्र