चाकणकरांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर होणार कारवाई उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

0

”चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकाच व्यासपीठावर आल्या असून, ही सकारात्मक बाब आहे. समितीच्या माध्यमातून विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत आहे. चाकण परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समन्वयाने काम करावे,” असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिले.

चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी पुण्यात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

अधिक वाचा  देशात २० हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा राजू शेट्टींचा आरोप ४८ लाख टन साखर गायब; कारखानदारांचेच नातेवाईक व्यापारी

पवार म्हणाल्या, ”चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकत्र आल्या आहेत. विविध प्रश्नांचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही केली जात आहे. चाकण हे मोठे औद्योगिक केंद्र असून देश-विदेशातील नागरिक आणि उद्योजक येथे येतात. त्यामुळे परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे.”

डुडी म्हणाले, ”वाहतूक कोंडीची ठिकाणे निश्चित करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे आणि साईडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई

अधिक वाचा  कर्वेनगर प्रभागात मा. महापौर आणि मा. आयुक्त संयुक्त दौरा; नगरसेवक स्वप्नील दुधानेंची ‘सुचक’ मांडणी प्रशासनही भारावले

चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या अतिक्रमणांना पाठबळ न देता प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य करणे आवश्यक आहे. चाकण परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. अतिक्रमण काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही.

– सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार म्हणाल्या…

चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तारामुळे १०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती

नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतही कार्यवाही

चाकण परिसराची स्वच्छता, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असणे आवश्यक

कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली

रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक कोंडीच्या ठिकाणांबाबतही प्राधान्याने कार्यवाही