दिल्लीतील कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या ‘कांदा एक्स्प्रेस’चा लासलगावमध्येच बोजवारा उडाला. ८४० टन कांदा दिल्लीला पाठविण्याचे नियोजन असताना प्रतवारी आणि पॅकिंगच्या ढिसाळ नियोजनामुळे ४२ तास गाडी स्थानकात खोळंबली.अखेर बुधवारी दुपारी ३.१० वाजता गाडी रवाना झाली; मात्र त्यात केवळ ४५३ टन कांदाच भरला. त्यामुळे तब्बल ३८७ टन कांदा कमी पाठविला गेला.







सोमवारी रात्री ११.५० वाजता २१ बोगींची मालगाडी लासलगाव स्थानकात दाखल झाली. मंगळवारी सकाळी सात वाजता ती दिल्लीला रवाना होणे अपेक्षित होते. मात्र, गोदामातील कांद्याची प्रतवारी आणि ४० किलोच्या गोण्यांचे पॅकिंग वेळेत पूर्ण झाले नाही. परिणामी लोडिंग रखडले आणि दिल्लीला जाणारी गाडी तब्बल ४२ तास लासलगावमध्येच अडकली. कांद्याच्या गुणवत्तेवरून प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांनी विरोध केला. निकृष्ट व सडलेला कांदा दिल्लीला पाठविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
३८७ टन कमी; खर्च मात्र पूर्ण
एनसीसीएफने १,२३५ ते २,३४५ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेला कांदा बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात आला होता. त्यापैकी ८४० टन दिल्लीला पाठविण्याचे निर्देश होते. मात्र, प्रत्यक्षात ४५३ टनच रवाना झाल्याने ३८७ टन कांदा कमी गेला. मालगाडीची क्षमता पूर्ण न भरताही वाहतुकीचा खर्च होणार असल्याने शासनाच्या नियोजनावर तसेच खर्चाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गाडी ३० तासांहून अधिक अतिरिक्त वेळ स्थानकात उभी राहिल्याने रेल्वेकडून डिटेन्शन शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. प्रतिबोगी सुमारे १५० रुपये प्रतितास दर गृहीत धरल्यास २१ बोगींसाठी अंदाजे एक लाख १५ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च होऊ शकतो. अंतिम शुल्क रेल्वेच्या हिशेबानंतर स्पष्ट होणार आहे.
सोमवार रात्री ११.५० : २१ बोगींची मालगाडी लासलगावला दाखल.
मंगळवार सकाळी ७ : दिल्लीसाठी गाडी रवाना होणे अपेक्षित.
मंगळवार दिवसभर : प्रतवारी व पॅकिंग अपूर्ण; लोडिंग रखडले.
मंगळवार-बुधवार : कांद्याच्या गुणवत्तेवरून विरोध; स्थानकावर तणाव.
बुधवार : ८४० ऐवजी ५०० टन कांदा लोड.
दुपारी ३.१० : प्रदीर्घ विलंबानंतर कांदा एक्स्प्रेस दिल्लीकडे
२२ ते २४ तास : दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज.
दिल्लीत ३५ रुपये प्रतिकिलो दराने कांदा
नवी दिल्ली : किरकोळ बाजारात कांद्याचे प्रति किलोचे दर ६० रुपयांवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था गुरुवारपासून दिल्लीत ३५ रुपये किलो अशा अनुदानित दराने कांद्याची विक्री करणार आहेत. बफर स्टॉकमध्ये असलेला कांदा दिल्लीसह अन्य मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अन्नधान्य खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते अनुदानित कांद्याच्या विक्रीची सुरुवात होणार असल्याची माहिती या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. ‘एनसीसीएफ’कडे ६२ हजार टनाचा बफर स्टॉक असून यातील ४०० टन कांदा दिल्लीत पोहोचणार आहे. कांद्याची वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाडीला ‘कांदा एक्सप्रेस’ असे नाव देण्यात आले आहे.












