राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी सुरूच आहेत. आज (ता. ४) पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, पूर्व विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.त्यामुळे या भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.







राजस्थानातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, या भागात समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा, राजस्थानतील बिकानेरपासून दिल्ली, लखनौ, पाटना ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर, तसेच दक्षिण तामिळनाडू आणि परिसराव समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.
सोमवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे नीचांकी १८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी सुरूच आहेत. उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे सर्वाधिक २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
आज (ता. ४) पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज कायम आहे.













