नीरा नदीचे रौद्ररूप! ६४ हजार क्युसेकने विसर्ग सुरू; ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल अन् दत्त मंदिर पाण्याखाली

0

वीर धरणातून सोडण्यात आलेल्या विक्रमी 64 हजार 523 क्युसेक पाण्यामुळे नीरा नदीने महापूराचे रौद्ररूप धारण केले असून, नदीवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल आणि प्रसिद्ध दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली गेले आहे.नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरात धोक्याची परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरा खोर्‍यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. 31) सायंकाळी वीर धरणातून सांडव्यावरून 62 हजार 924 क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे 1 हजार 400 क्युसेक, असा एकूण 64 हजार 523 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. या विक्रमी विसर्गामुळे नीरा नदीने रौद्ररूप धारण केले असून नदीकाठच्या अनेक भागांमध्ये पाणी वेगाने पसरले आहे.

अधिक वाचा  पीएमआरडीएसमोर ७३५ हेक्टर भूसंपादनाचा मोठा पेच! ४४ कोटींचा निधी वर्ग संमती न देणाऱ्यांचे सक्तीने भूसंपादन

दिवसभरात धरणातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला. सकाळी 6 वाजता 5 हजार 713 क्युसेक असलेला विसर्ग सकाळी 8 वाजता 14 हजार 939 क्युसेक, सकाळी 10 वाजता 24 हजार 220 क्युसेक, दुपारी 1 वाजता 33 हजार 468 क्युसेक, दुपारी 2 वाजता 42 हजार 833 क्युसेक, तर सायंकाळी 4 वाजता थेट 64 हजार 523 क्युसेक करण्यात आला.

नीरा खोर्‍यातील चारही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. भाटघर धरण 93.52 टक्के, निरादेवघर धरण 97.42 टक्के, गुंजवणी धरण 91.16 टक्के, तर वीर धरण 100 टक्के भरले आहे. चारही धरणांमध्ये मिळून 46.280 टीएमसी (95.76 टक्के) पाणीसाठा झाला असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे.

अधिक वाचा  मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन

निरा देवघर धरणातून 16 हजार 374 क्युसेक आणि गुंजवणी धरणातून 2 हजार 961 क्युसेक विसर्ग सुरू असल्याने वीर धरणातील आवकही वाढली आहे. चारही धरणांमध्ये एकूण 2.472 टीएमसी पाण्याची आवक नोंदविण्यात आली आहे. महापुरामुळे नीरा शहरातील नदीकाठचा परिसर जलमय झाला आहे. ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, प्रसिद्ध दत्त मंदिरालाही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणार्‍या ऐतिहासिक पुलावरूनही पाणी वाहत असल्याने हे दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी हा निसर्गाचा रौद्र अविष्कार आपल्या मोबाईलमध्ये टिपला. नदीकाठावर नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे.

अधिक वाचा  हरित पुणे १०८ कोटी लाटले पण १० टक्केच काम; काँग्रेस गटनेते ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडून कारभार चव्हाट्यावर

जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटिशकालीन पुलाकडे जाणारा मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. नीरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हरिचंद्र करे, माजी पोलीस पाटील राजेंद्र भास्कर आणि प्रभारी पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले.

“नीरा ग्रामपंचायतीच्या वतीने शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वार्ड क्रमांक 1 मधील संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आवश्यकतेनुसार त्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.”

– उपसरपंच