पुढचे २४ तास महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे जळगावला रेड अलर्ट

0

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर धरला असून अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील २४ तास राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर पुणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांनाही रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? धर्मेंद्र प्रधान यांच्या पुनरागमनाचीही चर्चा; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

पावसामुळे पुण्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून पानशेत धरणात ९८.३८ टक्के, वरसगाव धरणात ९५.२८ टक्के आणि टेमघर धरणात ८३.६ टक्के पाणीसाठा झाला आहे. चारही धरणांमधील एकूण पाणीसाठा ९५.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, कोयना आणि वारणा धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्याने भीमा नदीतील विसर्ग वाढवण्यात आला असून चिंचपूर बंधारा पाण्याखाली गेल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्यात १२ प्रमुख रस्ते आणि महामार्गांवरील वाहतूक अद्याप बंद आहे, तर हिंगोलीतील समगा परिसरात पुलावरून पाणी वाहत असल्याने सुमारे १५ गावांचा संपर्क खंडित झाला आहे.

अधिक वाचा  कॅबिनेट मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड समोर, सोशल मिडियाचा सर्वाधिक चांगला वापर कोणी केला? मोदी कितव्या क्रमांकावर?

अमरावतीच्या राजुरा येथे पुरात अडकलेल्या सात जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. तर यवतमाळमध्ये पैनगंगा नदीच्या पुरामुळे चार गावांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.