कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यताही वर्तविली आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार असून, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.






हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी, तर विदर्भातील तुरळक भागांत पुढील दोन ते तीन दिवस गडगडाटासह पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, राज्यातील बहुतांश भागांत दिवसाचे वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे.
विदर्भातील वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत १७ आणि १८ जूनदरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तसेच १८ आणि १९ जून रोजी धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्यांनाही उष्णतेच्या लाटेचा फटका बसू शकतो.
दरम्यान, पुणे आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १७) कमाल आणि किमान तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर २४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.











