केंद्र सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त “Phule Across India” सारखे भव्य उपक्रम राबवले जात असून देशभर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांची घोषणा करण्यात येत आहे आणि २०० व्या द्विशताब्दी वर्षानिमित्त १२६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करून मोठा गाजावाजा सुरू आहे. पण कडू वास्तव हे आहे की, ज्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी ज्योतिबांनी आयुष्य वेचले, त्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील ‘महात्मा फुले अध्यासन पीठ’ वर्षानुवर्षे प्रमुखांविना रिक्त असल्याने प्रत्यक्षात त्यांच्या विचारांच्या अभ्यास आणि संशोधनाबाबत गंभीर उदासीनता असल्याची टीका ओबीसी नेते श्री. मृणाल ढोले पाटील यांनी केली आहे.






सामाजिक न्याय, शिक्षण आणि बहुजनांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जात असताना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील “महात्मा फुले अध्ययन पीठ” वर्षानुवर्षे प्रमुखांविना रिक्त असल्याची बाब गंभीर असल्याचे श्री. मृणाल ढोले पाटील यांनी म्हटले आहे. फुले यांच्या विचारांचा अभ्यास, संशोधन आणि समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले हे अध्ययन पीठ निष्क्रिय अवस्थेत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शैक्षणिक आणि सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षण, शूद्र-अतिशूद्रांच्या हक्कांसाठी, अस्पृश्यता निर्मूलनासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी संघर्ष केला. परंतु आज त्यांच्या नावाने केवळ शासकीय कार्यक्रम आणि राजकीय प्रतिमा उभारणी होत असल्याचा आरोप श्री. ढोले पाटील यांनी केला आहे. विचारांचे संस्थात्मक संवर्धन, संशोधन प्रकल्प, विद्यार्थी अभ्यासवृत्ती, सामाजिक धोरणांवरील संशोधन आणि आधुनिक संदर्भातील फुले विचारांचा प्रसार या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“फुले यांच्या वारशाचा सन्मान करायचा असेल तर केवळ जयंती उत्सव, पोस्टरबाजी आणि घोषणांपेक्षा त्यांच्या विचारांवर आधारित गंभीर संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे,” असे मत श्री. मृणाल ढोले पाटील यांनी व्यक्त केले. विद्यापीठांमधील अध्ययन केंद्रे सक्षम करणे, रिक्त पदे तातडीने भरणे, संशोधन निधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर अभ्यासमूलक धोरणे विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
“उत्सव पाहिजेत, पण आधी अभ्यासाचे काम सुरू करा,” असा स्पष्ट संदेश देत श्री. ढोले पाटील यांनी फुले यांच्या नावाने राजकीय भाषणे देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता प्रत्यक्ष कृतीतून फुले विचारांना बळ द्यावे, अशी मागणी केली.
या साठी पूर्वी देखील विद्यापीठाकडे व सरकार कडे वारंवार मागणी करून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 25 जुलै 2025 ला एक परिपत्रक काढून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते, पण एक वर्ष उलटून गेले तरी त्याचं पुढे काय झाले काही कळलं नाही.
तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने “महात्मा फुले अध्ययन पीठ” तातडीने कार्यान्वित करून त्यासाठी पूर्णवेळ प्रमुख नेमावा, संशोधन उपक्रम सुरू करावेत आणि विद्यार्थ्यांना फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या अभ्यासासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
फुले यांचे विचार हे केवळ इतिहासाचा भाग नसून आजच्या सामाजिक विषमता, शिक्षण, आरक्षण, स्त्री हक्क आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर मार्गदर्शक ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्या वारशाचा केवळ प्रतीकात्मक वापर न करता त्याचे शैक्षणिक आणि सामाजिक रूपांतर होणे आवश्यक असल्याचे श्री. मृणाल ढोले पाटील यांनी नमूद केले.













