पनवेल दि. ३ (अधिराज्य) महामानव विचार मंच या संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमेचा पवित्र दिवस सुरेश शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० ते रात्री ११.०० या वेळेत बोधीवृक्ष, देवद, नवीन पनवेल येथे अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील उपासक-उपासिका, मान्यवर पाहुणे तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.






कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव विचार मंचचे कार्याध्यक्ष प्रवीण राकेश रसाळ यांनी आपल्या भारदस्त व पहाडी आवाजात प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत बुद्धांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करीत असताना “जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. युद्धाने आणि शस्त्राने जग जिंकता येते; परंतु माणसाचे मन जिंकण्यासाठी करुणा आवश्यक आहे आणि करुणेचा हा मार्ग तथागत भगवान गौतम बुद्धांनी दाखविला आहे. आजच्या अस्थिर जगात जर खरी शांतता हवी असेल, तर शस्त्रांचा नव्हे तर बुद्धांच्या विचारांचा स्वीकार करणे गरजेचे आहे. कारण जग जिंकण्यापेक्षा मन जिंकणे मोठे असते,” असे प्रभावी प्रतिपादन केले. तद्नंतर संस्थेचे ज्येष्ठ सदस्य भगवान यादव तसेच उपस्थित पाहुणे विष्णू मोरे यांनी दीपप्रज्वलन करून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संस्थेचे संचालक स्वप्नील यादव, खजिनदार हरेश खैरे, अजय जाधव, सुरेंद्र कांबळे, रुपेश यादव, तुषार यादव व सुरज कांबळे यांनी अगरबत्ती प्रज्वलित करून आदर्शांच्या प्रतिमांस पुष्पासुमने अर्पण केली. त्यानंतर अध्यक्ष सुरेश शिरसाठ व सुरेंद्र साखरे यांनी आपल्या मंगलमय वाणीने धम्म वंदना घेत पूजाविधी संपन्न केला.
अध्यक्षीय भाषणात सुरेश शिरसाठ यांनी बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व विशद करीत असताना “आज आपण साजरी करत असलेली बुद्ध पौर्णिमा ही केवळ एक तिथी नसून मानवजातीला प्रकाश देणारा ऐतिहासिक क्षण आहे. याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण घडले, म्हणून हा दिवस त्रिविध पवित्र मानला जातो. बुद्धांनी ‘द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही; तो फक्त करुणा आणि प्रेमानेच संपतो,’ असा अमूल्य संदेश दिला आहे. प्रज्ञा, शील आणि करुणा हीच आपल्या जीवनाची खरी दिशा असून हाच धम्माचा सार आहे.” असे नमूद केले.
दुपारच्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. इयत्ता पहिली ते सातवीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवर, येणारे-जाणारे नागरिक तसेच उपासक-उपासिकांना खीर वाटप करण्यात आले.
सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद जाधव व बुलंद आवाजाचे ख्यातनाम गायक रूपेश यादव यांच्या बुद्धभीम गीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली यावेळी ख्यातनाम ढोलकीपटू विनोद कदम यांनी आपल्या दमदार साथसंगतीने कार्यक्रमात वेगळाच रंग भरला.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष सुरेश शिरसाठ यांनी सामूहिक वंदना व मंगलपाठ घेत उपस्थितांना धम्ममार्गावर चालण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेणारे गणेश पेंडुरकर, अजय जाधव, हरेश खैरे, स्वप्नील यादव, तुषार यादव, अमोल वाघमारे, सुरेंद्र कांबळे, बुद्धभूषण जाधव, सुरज कांबळे, दीपक बेटकर, दिगंबर काळे, विश्वस्त मंडळ, महिला मंडळ तसेच गणेश मंडप डेकोरेटर्सचे अण्णा जुवेकर, सर्व मान्यवर पाहुणे, उपासक-उपासिका यांचे कार्याध्यक्ष प्रवीण रा. रसाळ यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने बुद्धांच्या विचारांचा संदेश समाजमनात अधिक दृढपणे रुजविण्याचे कार्य केले.











