माणुसकीचा उज्ज्वल संदेश खडसे कुटुंबीयांचे धैर्य कौतुकास्पद सासऱ्यांचाही पुढाकार: हा २व्यक्तींचा मिलाप नसून नवा आदर्श

0

जीवनात अचानक कोसळलेल्या दुःखानंतरही माणुसकी, समजूतदारपणा आणि प्रेम यांच्या आधारावर नव्याने उभं राहता येतं, याचं जिवंत उदाहरण आज शेगाव येथे पाहायला मिळाले. सासऱ्यांनी सुनेला लेकीप्रमाणे मान देत तिच्या पुनर्विवाहाचा घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला.दुःखाच्या खोल दरीतून महानंदा आता नव्या आयुष्याकडे मार्गस्थ झाली. शेगाव येथे पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.

वाटिका परिसरातील अन्नपूर्णा हॉटेल येथे आज रविवार ता.२६ एप्रिल रोजी महानंदा गजानन खडसे (रा.वाशीम) यांचा पुनर्विवाह मंगेश मधुकर भुतेकर (व्यवसाय इंजिनिअर) यांच्यासोबत पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक विधींनी पार पडला. महानंदा यांचा विवाह २०२० मध्ये गजानन निंबाजी खडसे (संचालक, मराठा इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड प्लम्बिंग, वाशीम) यांच्याशी झाला होता. प्रतिकूल परिस्थितीतही दोघांनी संसाराची गोड सुरुवात केली होती. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. ९ एप्रिल २०२४ रोजी गजानन यांचा अकाली व दुर्दैवी मृत्यू झाला आणि अवघ्या २६ वर्षांच्या महानंदा यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. या कठीण काळात खडसे कुटुंबीयांनी तिला कधीच एकटं पडू दिलं नाही. सुनेऐवजी लेकीप्रमाणे तिची काळजी घेत, मानसिक आधार देत तिच्या आयुष्याला नव्या दिशेचा विचार करण्याची ताकद दिली. याच दरम्यान काही सामाजिक बांधीलकी जपणारे जगन्नाथ मोरे, गजानन बोरकर, वसंतराव मोरे, विकास वाझुळकर यांनी खडसे कुटुंबीयांची भेट घेत विधवा पुनर्विवाहाचा विचार मांडला. सुरुवातीला भावनिकदृष्ट्या कठीण वाटणारा हा निर्णय सासरे निंबाजी खडसे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने स्वीकारला. त्यांनी केवळ संमती दिली नाही, तर महानंदा यांना नव्या आयुष्याची दिशा स्वीकारण्यासाठी प्रेमाने तयार केले.

अधिक वाचा  राज्यातील 18 जिल्हे निशाण्यावर, हवामान खात्याकडून ‘येलो अ‍ॅलर्ट’ जाहीर; बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात बदल

या विवाहासाठी नातेवाईकांनीही मोठा पुढाकार घेतला. वरुड येथील व्यवहारे, शिवाजी बोरकर, ज्योतीताई बोडखे, राजेश पाटील सिरसाट तसेच रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माधवराव भुतेकर यांनी योग्य स्थळ शोधून हा विवाह जुळवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या सहकार्याने योग्य स्थळ शोधण्यात आले आणि मंगेश भुतेकर यांच्याशी हा विवाह निश्चित झाला. मंगेश यांचाही हा दुसरा विवाह असून, दोघांनीही आयुष्यातील कठीण अनुभवांनंतर नव्याने संसार उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा मिलाप नसून, समाजाला सकारात्मक दिशा देणारा, नात्यांची खरी किंमत अधोरेखित करणारा आणि माणुसकी जपणारा आदर्श ठरत आहे. सासरच्या मंडळींनी सुनेला लेकीप्रमाणे मान देत तिच्या आनंदासाठी घेतलेला हा निर्णय अनेक कुटुंबांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.

अधिक वाचा  पुणे पालिकेचा निर्णय! महिलांना करात ५०% सवलत, या घरांनाच मिळणार लाभ, …अशा आहेत अटी व शर्ती!

खडसे कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य कौतुकास्पद

आजही समाजात विधवा पुनर्विवाहाबाबत काही ठिकाणी संकोच, परंपरागत विचार आणि गैरसमज आढळतात. अशा परिस्थितीत खडसे कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य, समजूतदारपणा आणि सामाजिक जबाबदारी निश्चितच कौतुकास्पद आहे. दुःखाच्या सावटातून बाहेर पडत नव्या आशा, नव्या स्वप्नांसह जीवनाला पुन्हा एकदा सामोरे जाण्याचा हा प्रयत्न आहे.