महिला मुक्ती दिनाचं श्रेय खऱ्या अर्थानं बुद्ध कालीन महाप्रजापतीला जाते – प्रा. आशाताई कांबळे

0

मुंबई दि. ९ (रामदास धो. गमरे) “आपल्या देशात बौद्ध संस्कृती आणि विषमतावादी संस्कृती अश्या दोन संस्कृती नांदत होत्या, बौद्ध संस्कृती मध्ये महिलांना समान अधिकार होते तर विषमतावादी संस्कृतीत महिलांना दुय्यमस्थान होते म्हणूनच नागपूरच्या बोलीभाषेत पुरुषांना माणूस तर महिलांना बाईमाणूस अस संबोधल जात असे मग आम्ही स्त्रिया माणसं नाहीत का असा प्रश्न निर्माण होतो. महिला मुक्ती दिन हा आनंदाचा दिवस असतो पण तो फक्त महिलांनी साजरा करायचा का ? आपल्या आंबेडकरी चळवळीत कोणताही कार्यक्रम असला तरी तो पुरुष व महिला यांच्या उपस्थितीत होतो म्हणजेच याठिकाणी महिलांना समान अधिकार व समानतेचा दर्जा दिला जातो.

१९४९ साली सियान बुआ या परदेशी महिलेने लिहिलेल्या पुस्तकात एक महत्वाचं वाक्य होत की जन्माला येतो तो माणूस परंतु नंतर आपल कुटुंब आणि समाज त्यांना स्त्री आणि पुरुष संबोधतात हे वाक्य जगात इतकं गाजल की १७ देशाच्या कामगार महिलांनी बंड पुकारला त्यावेळी युनोने ८ मार्च १९७५ साली महिला दिन म्हणून घोषित केला. परंतु खऱ्या अर्थानं जर आपला मुक्ती दिन कोणता असेल तर तो २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून आपल्याला गुलामीतून मुक्त करून आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे मी मानते, सियान बुआ हिने १९४९ साली जरी स्त्री पुरुष समानतेची भूमिका मांडली असली तरी याआधीच्या काळाचा विचार केला तर अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धकालीन सोमा थेरी नावाच्या महिलेने पाचशे बावीस गाथा पाली भाषेत कविता स्वरूपात लिहिल्या आहेत ज्यात तिने स्त्री पुरुष समानतेचा अधिकार हा त्यात आधीपासूनच सांगितलेला आहे म्हणजेच त्याकाळात ही समानतेचा अधिकार मिळवून देण्यात स्त्रियांचा ही सिंहाचा वाटा होता हे लक्षात येते, त्याचच अनुसरण करून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनवून आताच्या काळात स्त्री पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. बुद्ध काळात पुरुषांना भिक्षू संघात प्रवेश होता परंतु स्त्रियांना भिक्षू संघात प्रवेश निषिद्ध होता त्यामागे बुद्धांची स्वतःची अशी भूमिका किंवा काही वेगळी तत्व होती, त्यावेळी महाप्रजापतीने बुद्धांना विनंती केली परंतु त्याहीवेळी बुद्धांनी त्यांना नकार दिला मग महाप्रजापतीने कपिलवस्तू येथे पाचशे महिलांना एकत्रित करून त्यांचं मुंडण करून त्यांना चिवर परिधान करून अनवाणी पायाने कपिलवस्तू ते कुशीनगर पर्यंत जेथे बुध्द होते तिथवर पदयात्रा काढली व त्याना बुद्धांसमोर हजर केलं त्यावेळी त्या महिलांच्या पायातून रक्त वाहत होत, डोळ्यात अश्रू दाटून आले होते परंतु तरी देखील न डगमगता त्यांनी पदयात्रा पूर्ण करून बुद्धांसमोर उपस्थित झाल्या व आम्हाला संघात प्रवेश द्या अशी मागणी केली, तथागत गौतम बुद्ध त्यावेळी ही बुद्धांनी नकार दिला परंतु नंतर बुद्धांनी विचार करून महिलांना भिक्षू संघात प्रवेश देऊन महिला भिक्षू संघ निर्माण केला, ही समानता बुध्द काळापासून आली तिचा खऱ्या अर्थाने वारसा सिंदखेडराजाचे राजे लखोजी जाधव यांनी चालवला व आपली मुलगी जिजाऊ हिला घोडेस्वारी, तलवारबाजी आदी सर्व प्रशिक्षण दिले पुढे याच जिजाऊंनी शिवरायांना घडवलं व रयतेच राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली सोबतच शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना जिजाऊंनी सहा महिने स्वराज्य चालवलं पुढे जिजाऊंच्या पदचिन्हांवर पाऊल ठेवत अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनीही ही स्त्री पुरुष समानतेसाठी लढा सुरू ठेवला, त्यागमुर्ती रमाईने ही बाबासाहेबाना साथ देऊन त्यांना तळागळातील समाजासाठी काम करण्यास मदत केली व पुढे बाबासाहेबांनी मनुस्मृतीच्या दहनाच्या माध्यमातून संविधानात स्त्री पुरुष समानतेची अधिकारी स्वरूपात समावेश केला म्हणून २५ डिसेंबर १९२७ हा खऱ्या अर्थाने भारतीय महिलांचा महिला मुक्ती दिन आहे.” असे प्रतिपादन आशाताई कांबळे यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बोलत असताना केले.

अधिक वाचा  पुणे महापालिका आयुक्तांनी 1377 कोटींनी अर्थसंकल्प वाढवला; स्थायी समितीचा कोणत्या विभागाला झटका?

बौध्दजन पंचायत समिती संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मध्यवर्ती महिला मंडळ अध्यक्षा सुशिलाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई, माता भीमाई आणि महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तद्नंतर मंगेश पवार गुरुजी यांनी आपल्या सुमधुर आवाजात धार्मिक पठणविधी संपन्न केला, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे आणि मध्यवर्ती महिला मंडळाच्या सरचिटणीस अंजलीताई मोहिते यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत केले. सदर प्रसंगी कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी बौद्धजन पंचायत समितीचा बुद्धाच्या शाक्य कुळासोबत असलेला संबंध यावर आपले विचार मांडून, बौद्धजन पंचायत समितीच्या कामकाजात महिलांना कश्या प्रकारे प्राधान्य दिले जाते त्यांना समान अधिकार दिले जातात याबद्दल मार्गदर्शन केले. तर उपसभापती विनोद मोरे यांनी महिला दिनानिमित्त वक्त्यांनी आपल्या भाषणात ज्या भूमिका मांडल्या त्याचा आढावा घेत त्यावर भाष्य केले व महिला दिनानिमित्त आपल्या असलेल्या जबाबदारी याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. बौद्धजन पंचायत समितीचे शताब्दी वर्ष येत आहे त्यावेळी मोठी समिती गठित करण्यात येणार असून तिला राज्यसभेसारखा दर्जा देऊन आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देशविदेशातील भंते जी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, विविध देशातील, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत तेव्हा मध्यवर्ती महिला मंडळाच्या सदस्या, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात सुशिलाताई जाधव यांनी महिला मुक्ती दिनानिमित्त आपले विचार व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी महिला मंडळाच्या चिटणीस सायली साळवी, सरोजनी शिरगावकर, सोनाली गायकवाड, ज्योती तांबे, निता जाधव, रसिका पवार, खजिनदार प्रज्ञा जाधव, पतपेढीच्या सौ. लोखंडे आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या त्याबरोबर चिटणीस लवेश तांबे, यशवंत कदम, भगवान तांबे, तुकाराम घाडगे, संदेश खैरे, विभागीय गटप्रतिनिधी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, महेंद्र पवार, श्रीधर जाधव, रवींद्र शिंदे, विभागातील शाखा त्यांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून अंजलीताई मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची सांगता व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न