शरद पवार अजितदादांची अंतिम इच्छापूर्ती करणार का? अजित पवारही होते आग्रही; 16 जानेला चर्चाही झाली

0

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सर्व राजकीय समीकरणं एका क्षणात बदलली. उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार विराजमान झाल्या आणि यासमवेत कैक दिवसांपासून सुरू असणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाला काहीसा विराम मिळताना दिसला. शरद पवार यांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष असे दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार याची जवळपास निश्चिती झाली असून, या विलिनीकरणानंतर शरद पवार राजकारणापासून अलिप्त राहणार होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार राजकीय संन्यासाच्या तयारीत, पण…

एकिकडे शरद पवार राजकीय संन्यासाच्या तयारी असतानाच ते सामाजिक कार्यात मात्र सहभागी राहणार होते. शरद पवारांची राज्यसभेची टर्म एप्रिल महिन्यात संपणार असली तरीही, राजकारणाच्या या वर्तुळात सक्रिय राहत त्यांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असा खुद्द अजित पवार यांचाच आग्रह होता. किंबहुना राष्ट्रवादीच्य़ा विलिनीकरणानंतर शरद पवार पक्षाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवणार होते.

अधिक वाचा  पतित पावन संघटनेतर्फे ‘स्मार्ट मीटर’ लावण्यास विरोध; महावितरण पुणे ऑफिस बाहेर स्मार्ट मिटरच्या पोस्टरची होळी

पक्षाच्या अध्यक्षपदापासून ते निर्णय घेण्याचे सर्व अधिकार अजित पवार यांच्याकडे राहणार होते तर, जयंत पाटील यांच्यावरही मोठ्या जबाबदारीचा प्रस्ताव होता. मात्र अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातानं महाराष्ट्राचं एक अष्टपैलू नेतृत्त्वं हिरावलं आणि राज्याच्या राजकारणाला भलतंच वळण मिळालं.

तटकरेंनाही होती विलिनीकरणाची कल्पना..

दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना असल्याची माहिती सूत्रांमार्फत समोर आली आहे. 16 जानेवारी 2026 रोजी तटकरे हे प्रेमकोर्ट या अजित पवार यांच्या निवासस्थानी गेले असता तिथं अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना भेटले देखील होते. याच बैठकीत अजितदादांनी तटकरे यांना विलिनीकरणाची कल्पना दिली होती अशी माहिती एनसीपीच्या सूत्रांनी दिली आहे.

अधिक वाचा  शरद पवार यांच्या कुस्तिगीर परिषदेला उच्च न्यायालयाकडून दणका; १ जानेवारी २०२३ रोजीचा भारतीय कुस्ती महासंघाचा हा निर्णय कायम

अजित पवारांच्या विमान अपघाताचा अहवाल प्रतिक्षेत..

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी या अपघातासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत हा घातपात असल्याची शंकासुद्धा व्यक्त केली होती. ज्यानंतर व्हीएसआर या विमान कंपनीवर तात्काळ कारवाईची मागणी करत या प्रकणाची चौकशी सुरू असेपर्यंत रोहित पवारांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. विमान अपघातास, इतके दिवस उलटूनही अहवाल अद्याप जारी करण्यात आलेला नसल्यानं ही दिरंगाई का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.