देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव वाढू लागला असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी १९ राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोकण-गोवा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, बिहार, झारखंड, केरळ आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारेही वाहू शकतात.






हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अनेक भागांत ५० ते ७० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, बिहार, तेलंगणा आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये वाऱ्यांचा वेग ८० किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचू शकतो.
दार्जिलिंग ते कूचबिहार आणि सिक्कीममधील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुढील ८ ते ४८ तासांत या भागांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच २३ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील काही भागांमध्ये २० ते २४ जूनदरम्यान खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला मच्छीमारांना देण्यात आला आहे. एकीकडे पावसाचा जोर वाढत असताना, बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसासोबतच उकाड्याचा त्रास जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.













