राज्यातील १२ जिल्हा परिषद कुणाची बाजी? 9 ठिकाणी महायुतीचा झेंडा; माविआ मात्र चिंताजनक स्थितीत; वाचा सविस्तर

0

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांमध्ये भाजपने पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकत सामनावीराचा किताब पटकावला. भाजपने बारापैकी पाच ठिकाणी निर्भेळ यश मिळविले, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत महापालिका निवडणुकीतील पराभवाची परतफेड केली. येथे पक्षाच्या पाठीशी मोठी सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली. काँग्रेसने सांगली, कोल्हापूर आणि लातूरमध्ये ताकद दाखवून दिली, पण नंतर मात्र बहुमतापासून दूर राहिल्याने त्यांच्या वाट्याला एकही जिल्हा परिषद येऊ शकली नाही.

राज्यातील १२ जिल्हा परिषदांमधील ७३१ तर १२५ पंचायत समित्यांमधील १ हजार ४६२ जागांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. भाजपने पाच जिल्हा परिषदा आणि ५२ पंचायत समित्यांमध्ये सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रत्नागिरी आणि रायगड जिल्हा परिषदेत यश मिळवीत २६ पंचायत समित्यांमध्ये विजय पताका फडकावली.

अधिक वाचा  कृष्णा आंधळे फरार तरीही तो तीनदा गावात…. बीड पोलीस करताय काय? धनंजय देशमुखांचा मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्यात एकहाती सत्ता मिळविली तर कोल्हापुरातही दमदार वाटचाल केली आहे. येथे मंत्री हसन मुश्रीफ पक्षाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २५ पंचायत समित्यांमध्ये सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सांगली वगळता राज्यातील इतर ठिकाणी मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला तर काहींना दिलासा मिळाला.

काँग्रेसला मोठा फटका

काँग्रेसला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मात्र मोठा फटका बसला आहे. लातूर आणि कोल्हापूर पालिकेत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला जिल्हा परिषदेत मात्र समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. लातूरमध्ये काँग्रेस मोठा पक्ष ठरला मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे तो सत्तेपर्यंत पोचण्याची शक्यता कमी आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बाराही जिल्हा परिषदांमध्ये जबर फटका बसला. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हा परिषदांमध्ये २०१७ मध्ये तेव्हाच्या एकत्रित शिवसेनेची सत्ता होती. आता मात्र शिंदे यांच्या शिवसेनेने या दोन्ही जिल्हा परिषदांवर भगवा फडकावला आहे. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) मोठा धक्का बसला असून पक्षांतर करणाऱ्यांनाही मतदारांनी नाकारल्याचे दिसून येते. शेकापला येथे एकही जागा मिळू शकलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची एकाही जिल्हा परिषदेत सत्ता येऊ शकलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची १२५ पंचायत समित्यांच्या माध्यमातून केवळ ५ तालुक्यांत सत्ता येईल. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पदरीही निराशा पडली. शरद पवार यांच्या पक्षाची केवळ ८ तालुक्यांतील पंचायत समित्यांमध्ये सत्ता येणार आहे.

पुण्यामध्ये सहानुभूतीची लाट

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने राष्ट्रवादीच्या पाठीशी मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. पुण्यात फारसा प्रचार न करताही केवळ या लाटेवरच पक्षाला मोठे यश मिळाले आहे.

अधिक वाचा  उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात टीकेत वाढ; तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात प्राथमिक अहवाल या दिवशी?

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामविकासाचे कार्य हातात घेतले. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. आवास योजना, लखपती दीदी योजना या माध्यमातून विश्वासाचे वातावरण केले. महाराष्ट्र सरकारनेही कार्य केले. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना समर्थन मिळाले.

– देवेंद्र फडणवीस

झेडपीत कोणाचा कुठे विजय?

भाजप – सिंधुदुर्ग, लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर

शिवसेना – रायगड, रत्नागिरी

राष्ट्रवादी काँग्रेस – पुणे, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – सांगली

त्रिशंकू – सातारा

पंचायत समिती निकाल

भाजप – ४५९

राष्ट्रवादी ३०६

शिवसेना ३०२

राष्ट्रवादी (एसपी) ४६

काँग्रेस ९७

शिवसेना उबाठा – ८९

इतर ८६