पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

0

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा मुळामुठा नदीत विसर्ग करावा लागला आहे. परंतु नदीची वहन क्षमता कमी झाल्याने पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पुराचा धोका ४० टक्क्यांनी वाढल्याचे जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालात स्पष्ट झाले आहे, असा दावा पर्यावरण प्रेमी सारंग यादवडकर, विवेक वेलणकर, पुष्कर कुलकर्णी यांनी केला आहे. गेल्या महिन्यात पुणे शहर व घाट माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळामुठा नदीला पूर आला होता. यामध्ये नदीकाठचा निवासी भाग पाण्याखाली गेल्याने १३०० पेक्षा जास्त नागरिकांना महापालिकेने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले होते. त्याच प्रमाणे गेल्यावर्षी मुठा नदीला आलेल्या पुरात एकतानगरी येथील घरांमध्ये पाणी घुसले होते.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

जलसंपदा विभागाने २०११ मध्ये मुळा-मुठा नदीची पूररेषा ही १ लाख १८ हजार क्यूसेकला इशारा पातळी निश्‍चित केली आहे. नदीमध्ये एवढे पाणी आल्यानंतर बंडगार्डन येथील बंधाऱ्याजवळ ५४२.४५ मिटर ही पूररेषा असते. ही पूर रेषा न ओलांडता १ लाख १८ हजार क्युसेक पाणी वाहून गेले पाहिजे. पण मुळा-मुठा नदीपात्रातील गाळ, अतिक्रमणे, नदीत भराव टाकणे, नदी पात्रात अडथळे निर्माण करणे यामुळे नदीची वहन क्षमता गेल्या १४ वर्षात ४० टक्क्यांनी कमी झाली आहे.

२५ जुलै २०२४ रोजी बंडगार्डन येथे ६९ हजार १११ क्यूसेक पाणी असताना तेथील पाण्याची पातळी ही ५४२.६० मिटर इतकी होती. त्याच दिवशी संध्याकाळी ८८ हजार ८८८ क्युसेकचा प्रवाह असताना ५४३.४० मिटर इतकी पातळी झाली होती. तर यावर्षी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७१ हजार ४०८ क्सुसेक पाणी बंडगार्डन येथे होते, तर पुराची पातळी ५४२.७० मिटर इतकी होती. याचा अर्थ

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण

जलसंपदा विभागाने १ लाख १८ हजार क्युसेक पाण्याला ५४२.४५ मिटर इतकी पूर पातळी निश्‍चित केली असताना त्यापेक्षा कमी पाणी असताना ही पूर पातळी गाठली जात आहे. त्यामुळे ४० टक्के पुराचा धोका वाढला आहे. हे लक्षात घेऊ प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी यादवडकर, वेलणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

महत्त्वाचे मुद्दे

– नदीची वहन क्षमता गाळ व अतिक्रमणामुळे घटली.

– धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पुराचा धोका ४० टक्क्यांनी वाढला

– जलसंपदा विभागाने १ लाख १८ हजाराला पूररेषा निश्‍चित केलेली असताना त्यापेक्षा कमी पाणी असताना पूर येत आहे.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

– महापालिकेने व पाटबंधारे विभागाने अतिक्रमणे काढली पाहिजेत.