मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर भागातील शेतकरी वर्गांसाठी एकमेव सुरू असलेला अन अत्याधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानाची पूर्णत्वाची कडी (को-जन इथेनॉल) लागलेल्या श्री संत तुकाराम साखर कारखान्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार प्रचंड मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आलेल्या अर्जामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल की चुरशीची होईल ही सध्या चर्चा पाचही तालुक्यांमध्ये सुरू झाले आहे. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विद्यमान अध्यक्ष यांनी कारखान्याची स्थापना केल्यापासून कायमच सर्वपक्षीय नेतृत्वांना संधी देत या कारखान्याची वाटचाल उल्लेखनीय स्तरावर ती नेण्याचे काम केले आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्व संचालकांनी अर्ज दाखल केल्याने अन त्यातच विद्यमान 3 आमदारांपैकी पात्र सुनील शेळके यांच्यासह अन्य दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे नव्याने लक्ष लागले आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा ऊर्फ नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांच्यासह बहुतांश विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध की चुरशीची होणार? अशी चर्चा सुरू झाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.






श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये विद्यमान अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालकांनी सलग पाच वर्षे केलेल्या कामगिरी वरती शेतकरीवर्ग खुश असला तरी सुद्धा नव्या बदलत्या राजकीय समीकरणांनुसार या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूरचा अंतर्भाव आहे. मावळमध्ये आमदार सुनील शेळके, मुळशीमध्ये शंकर मांडेकर तर शिरूरमध्ये माऊली कटके असे तीन आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहेत. त्यांच्या वतीने नव्या समीकरणांची जुळवणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच श्री.संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाल्यापासून संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्या वतीने कायमच निवडणुकीमध्ये 70- 30 असा फॉर्मुला राबवण्यात आला आहे आणि आजपर्यंत तो यशस्वीही झाला असल्याची जाणीव सर्व शेतकरी वर्गांना आहे; परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र याबद्दल त्या समीकरणाचा कस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अतितटीच्या लढतीमध्ये चिंचवडचे आमदार शंकर जगताप व खेडचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबासाहेब काळे यांच्या भूमिकाही महत्वाच्या आहेत. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वर्चस्व असल्याने स्वतः अजित पवार यांनी या निवडणुकीत गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, तीनही आमदारांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोन आमदार नियमात बसत नसल्याने त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल केले आहेत.
तब्बल २२ हजार मतदारसंख्या
मावळ तालुक्यात तळेगाव-वडगाव मतदार संघ २ हजार २१५, सोमाटणे-पवनानगर मतदार संघात ३ हजार २१ असे एकूण ५ हजार २३६ मतदार आहेत. पौड-पिरंगुट ३ हजार ५४६, हिंजवडी-ताथवडे ३ हजार ३०८ असे एकूण ६ हजार ८५४ मतदार आहेत व अन्य असे एकूण २२ हजार ९१७ सभासद आहेत.
गटक्रमांक -1. -23
गट क्रमांक -2 -18
गट क्रमांक -3 -29
गट क्रमांक – 4 -41
गट क्रमांक -5 – 37
महिला राखीव -23
अनुसूचित जाती जमाती -9
इ मा व – 37
भ. वि. जाती जमाती -9. एकूण अर्ज 230
अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
राज्यातील सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मावळ, मुळशी, शिरूर तीन ठिकाणी त्यांचे आमदार असून हवेली तालुक्यात (चिंचवड) मित्र पक्ष भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे निवडणूक लावायची किंवा बिनविरोध करायची, यासाठी अजित पवार यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकास कामांना प्राधान्य देण्याची हातोटी आहे.सहकार क्षेत्रात त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कारखान्याच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवार जो निर्णय घेतील तो आमच्या तीनही आमदारांसह सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य राहील.
– सुनील शेळके, आमदार, मावळ













