रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नाथाभाऊंचे गंभीर आरोप अन् फडणवीसांनीही शिंदेंसमोरच थेट सुनावलं

0

राज्यात महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली.केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्यांचे काय असा सवाल उपस्थित होऊ लागला. रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींना माफी देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  पंढरपूर यात्रेचे नियोजन ठरले कौतुकास्पद; मंत्री जयकुमार गोरे यांचा राजा माने यांच्या हस्ते सत्कार

एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री स्पष्ट म्हणाले….

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, या घटनेत एका विशिष्ट राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. आरोपींना माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच असेही त्यांनी म्हटले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मु्ख्यमंत्र्यांसोबत होते. जळगाव प्रकरणातील आरोपी हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट राजकीय पक्षाचे पदाधिकारी असे म्हटल्याने हे प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

एकनाथ खडसे यांनीदेखील दाखवले बोट…

आपल्या नातीवर ओढावलेल्या प्रसंगाबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी आरोपींना राजकीय अभय असल्याचे म्हटले होते. मागील सरकारच्या काळातही तक्रार केल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी फोन करून सोडण्यास सांगितले होते असे खडसे यांनी म्हणत एकनाथ शिंदेंवर प्रश्न उभे केले.

अधिक वाचा  शाळेच्या पाहणीसाठी जाताच अभिजीत दिपके यांच्या सहकाऱ्यांना मारहाण; गावकऱ्यांचा हल्ला काचाही फोडल्या

नेमकी घटना काय?

मुक्ताईनगर येथे यात्रा महोत्सव सुरू आहे. या यात्रा महोत्सवात भाजपच्या मंत्र्यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली. सुरक्षारक्षकांनी टवाळखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु टवाळखोर त्यांच्यासमोर बधले नाहीत. त्यांनी शेरेबाजी करणे सुरुच ठेवले. तसेच मुलींना धक्काबुक्कीही झाली.

सदर प्रकरणाविरोधात सुरक्षारक्षक घाईघाईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गेले. त्यांच्या मागोमाग भाजपच्या बड्या नेत्याही तिथे पोहोचल्या. त्यांची पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. सदर आरोपींना काही तासांतच अटक झाली पाहिजे, अशा सक्त सूचना त्यांनी केल्या.