शिवसेना आमदारांच्या आणि काही नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. पण त्यात आत कपात केल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या आमदार, नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा नेत्याची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे, यात भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्याही काही नेत्यांचाही समावेश आहे.






मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील नेत्यांच्या व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश आहे.
या आधी शिवसेनेच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत होती. त्यामध्ये या आमदारांच्या पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या. तसेच या आमदारांच्या घराबाहेरही पोलिस सुरक्षा तैनात असायची. ही सर्व सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे.
आता शिंदेंच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे. त्यामुळे याआधी सरकारी सुरक्षेचा लवाजमाी घेऊन फिरणाऱ्या आमदारांना आता केवळ एका रक्षकासह फिरावं लागणार आहे, त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी संताप व्यक्त केला आहे.
शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदारांना त्यावेळी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. यावरुन सरकारवर टीकाही होत होती.पण अडीच वर्षांच्या काळात ती सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती. पण आता सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांच्यात नाराजीचा नवा अकं सुरु होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.











