भारतातील ‘या’ दिग्गज कंपनीनं उचललं मोठं पाऊल, 700 कर्मचाऱ्यांना झटक्यात दिला नारळ

0

अलिकडच्या काळात अनेक IT कंपन्यांमध्ये नोकरकपात केली जात आहे. याचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. अशातच आता Infosys या भारतातील IT क्षेत्रातील कंपनीनं देखील मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या म्हैसूर कॅम्पसमधून सुमारे 700 फ्रेशर्सना कंपनीने काढून टाकले आहे. आयटी कर्मचारी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (नाईट्स) यांनी युक्तिवाद केला की या फ्रेशर्सना कंपनीत रुजू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच काढून टाकले आहे.

अवघ्या सहा महिन्यात सोडली कंपनी

पदवीनंतर दोन वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि शेवटी सप्टेंबर 2024 मध्ये इन्फोसिससोबत काम करण्याची संधी मिळली. पण केवळ सहा महिन्यांत ती नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळं हा कंपनीत काम करत असलेल्या फ्रेशर्ससाठी मोठा धक्का आहे. हे धक्कादायक आणि अनैतिक असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली आहे. इन्फोसिसने काही महिन्यांपूर्वीच सुमारे 700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अखेर आज हा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दरम्यान याच मुद्द्यावर NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी कामगार मंत्र्यांना पत्र लिहून तीन मागण्या केल्या आहेत.

• औद्योगिक विवाद कायदा, 1947 चे उल्लंघन केल्यामुळे, इन्फोसिसवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात यावी.

• कायदेशीर तपास पूर्ण होईपर्यंत पुढील टाळेबंदी रोखण्यात यावी.

• काढून टाकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना भरपाईसह पुन्हा कामावर घेण्याची मागणी.

NITES ने इन्फोसिसवर आरोप

NITES ने आरोप केला आहे की कंपनीने टर्मिनेशन प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांना धमकवण्यासाठी बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक देखील तैनात केले आहेत. याबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ट्वीटरवर एकाने आपला राग व्यक्त केला, हे धक्कादायक आहे. इन्फोसिसकडून त्यांची ऑफर लेटर मिळाल्यानंतर, या फ्रेशर्सनी 2 ते 2.5 वर्षे वाट पाहिली आणि शेवटी सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीत रुजू झाले. होते. आता अवघ्या सहा महिन्यांनंतर यातील 700 लोकांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

टेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरूच आहे. 2024 मध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. इंटेल, टेस्ला, मायक्रोसॉफ्टसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी मिळून जवळपास एक लाख 49 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. टेस्ला ते इंटेल आणि सिस्को ते मायक्रोसॉफ्टपर्यंत, अनेक कंपन्यांनी पैशांची बचत करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांची पुनर्रचना करण्यासाठी, बदलत्या बाजाराच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या कामगारांची संख्या कमी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.