मनमोहन सिंगांविरोधात दंड थोपटलेले ‘अण्णा’ही भावूक; ज्यांच्या खुणा जगात नेहमीच जिवंत त्यापैकी एक व्यक्ती…

0

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. त्यानंतर जगभरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली.

अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात मोठे आंदोलन उभारले होते. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यांचे 2014 मध्ये सरकार जाण्यास हे आंदोलनही कारणीभूत ठरले होते. तसेच आम आदमी पक्षाचा उदयही याच आंदोलनातून झाला. आज मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना हजारेंना त्या आंदोलनाची आठवण झाली.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

‘पीटीआय’शी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, आंदोलनादरम्यान दोनदा पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली आणि त्यांनी झटक्यात निर्णय घेतला. समाज आणि देशाप्रती आस्था आणि प्रेम असेल तर एखादी व्यक्ती किती चांगले काम करू शकते, याचे मनमोहन सिंग उदाहरण आहेत. ते शरीराने आपल्यातून गेले असले तरी आठवणींमध्ये नेहमीच जिवंत असतील, अशी भावना हजारेंनी व्यक्त केली आहे.

रोज अनेक लोक जगात येतात आणि जातात. कोण गेले, हे कुणाला कळतही नाही. पण काही लोक असतात, जे आपल्या आठवणी मागे ठेऊन जातात. समाजासाठी ते असे काही करतात की त्यांच्या खुणा जगात नेहमीच जिवंत राहतात. मनमोहन सिंग त्यापैकी एक व्यक्ती होते, अशी भावना अण्णा हजारेंनी व्यक्त केली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मनमोहन सिंग यांच्यासाठी समाज आणि देश सर्वात प्रथम होता. ते नेहमी देशाचा विचार करायचे. त्यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलली. त्यामध्ये मनमोहन सिंग यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे देशाला एक नवीन दिशा मिळाली. देश आजही प्रगतीपथावर असल्याचेही हजारे म्हणाले.