थोडीथोडकी नव्हे तर शरद पवार सगळी भाकरी फिरवणार; विधानसभेच्या पराभवानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमकं काय घडणार?

0

विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्य पिंजून काढल्यानंतरही दारुण पराभव पदरी पडलेले राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अवघ्या 10 जागांवर विजय मिळाला होता. शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातील झंझावाती प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, प्रत्यक्ष निकाल समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार आगामी काळाच्यादृष्टीने पक्षात काही बदल करणार आहेत. शरद पवार हे येत्या काही दिवसांमध्ये ‘भाकरी’ फिरवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहेत. शरद पवार हे या खेपेला थोडीथोडकी नव्हे तर संपूर्ण भाकरी फिरवणार असल्याची माहिती आहे. त्यानुसार पक्षातील युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष यासह विविध सेलचे प्रमुख बदलले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत जंबो बैठक आयोजित करण्यात आली आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला शरद पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. 8 जानेवारीला सर्व सेल, आमदार, खासदार आणि विभागाच्या प्रमुखांची बैठक असेल. तर 9 जानेवारी रोजी शरद पवार हे आमदार, खासदार, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करणार आहेत. या दोन दिवसीय बैठकीत शरद पवार सर्वांची पक्षांतर्गत बदलाबाबत मतं जाणून घेणार आणि त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलण्यात येतील.

अधिक वाचा  एरंडवण्यात दिवाळीनिमित्त आपुलकीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सण; चंद्रकांतदादांच महिला भगिनींतर्फे औक्षण

जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राहणार की पायउतार होणार?

शरद पवार यांनी भाकरी फिरवल्यास जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार की नाही, याची चर्चा सुरु झाली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत देखील चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पक्षातील एका गटाला जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून हवे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. ते दिल्लीत पंतप्रधान मोदी यांना भेटणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईत उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि नेत्यांची भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार