मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे भाजप प्रवेश करणार हे आता निश्चित झालं आहे. 8 एप्रिलला एकनाथ खडसे यांना भाजप प्रवेशाची तारीख कळणार असून या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला थेट भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा देखील उपस्थित असणार आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयात महाराष्ट्रातून दिल्लीत जाऊन भाजपच्या निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मराठी चेहऱ्याचा हात असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेत भाजपलाच धोबीपछाड दिली आहे.






खडसे कुटुंबाला भाजपची ऑफर काय?
केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने खडसे कुटुंबाला पक्षात घेण्यास परवानगी दिल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासमोर एक अट ठेवली आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजपमध्ये सहभागी व्हावं. त्या बदल्यात एकनाथ खडसे यांच्या आमदारकीच्या जागी रोहिणी खडसे यांची उरलेल्या कालावधीसाठी पाठवणी होईल. मुळात एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांच्या जागी भाजपच्या आमदार म्हणून रोहिणी खडसे कशा काय जाऊ शकतील याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार सध्या विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केवळ तीन आमदार आहेत. यामध्ये एकनाथ खडसे स्वत:, आमदार अरुणअण्णा लाड आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला तर आपोआपच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी होईल आणि परिणामी ती जागा विधानपरिषदेत मोठ्या संख्येने असणाऱ्या भाजपकडे जाईल. भाजप रोहिणी खडसे यांची त्याच जागेवर वर्णी लावू इच्छित आहे.
रांगेत उभे राहून तिकिटाची वाट पाहण्यापेक्षा तिकिट वाटण्याला पसंती?
एकनाथ खडसे भाजप प्रवेश करणार याचाच अर्थ त्यांच्यासोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा असताना रोहिणी खडसे यांनी मात्र सर्वांनाच दे धक्का करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीच तुतारी वाजवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच सोशल मीडियात त्यांनी तुतारी वाजवतानाचा एक फोटो ट्विट केला आहे. रोहिणी खडसे यांच्या या निर्णयामुळे एका दगडात दोन पक्षांची शिकार रोहिणी खडसे यांनी केली.
रोहिणी खडसे यांना 2019 ला भाजपच्यावतीने केवळ एकनाथ खडसे यांच्यावर सूड उगवण्यासाठी मुक्ताईनगर विधानसभेतून ऐनवेळी एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी रोहिणी खडसे यांना इच्छा नसताना देखील कमी कालावधीत मुक्ताईनगरची निवडणूक लढावी लागली. त्यामुळे आपोआपच रोहिणी खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला. बापाची निवडणुकीला लढण्याची इच्छा असताना देखील त्यांचे तिकीट कापून पक्षाने आपल्याला दिली आणि त्या ठिकाणाहून आपणाला जिंकून येऊ दिलं नाही. ही खंत रोहिणी खडसे यांना सातत्यानं बोचत होती. स्वत:चा परिणामी वडिलांचा पराभव रोहिणी खडसेंच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळेच त्यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मतदारसंघातील गावंगाव धुंडाळायला सुरुवात केली होती.
आता मागील पाच वर्षात घेतलेल्या मेहनतीचं फळ येत्या सहा-सात महिन्यांमध्ये मिळणार असं दिसत असतानाच विधानपरिषदेवरील पुनर्वसनाच्या निमित्तानं भाजपने पुन्हा एकदा जुनाच डाव टाकत रोहिणी खडसे यांना विधानसभेच्या निवडणुकीपासून लांब करण्याचा प्रयत्न चालवल्याचं पाहिला मिळत होतं. परंतु रोहिणी खडसे यांनी देखील खटक्यावर बोट जाग्यावर पलटी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच फायदा रोहिणी खडसे यांची आत्ताच मुक्ताईनगर विधानसभेची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. शिवाय रोहिणी खडसे भाजपमध्ये जात नसल्यामुळे आपोआपच एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा विषय प्रलंबित पडणार आहे. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची बातमी येताच रोहिणी खडसे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
रोहिणी खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. या निमित्ताने राज्यभरात संघटनावाढीच्या दृष्टीनं त्यांना काम करण्याची संधी मिळतेय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना जो सन्मान मिळतोय, तो भाजपमध्ये गेल्यावर मिळेल का? हा देखील प्रश्नच आहे. भाजपमध्ये सध्या कार्यरत असलेल्या महिला नेत्यांची संख्या पाहता रोहिणी खडसे यांचं कार्यक्षेत्र मर्यादित होण्याची शक्यता आहे. शिवाय जर भाजपमध्ये गेल्या तर त्यांना देखील तिकिट मिळण्यासाठी रांगेत उभं राहून वाट पाहण्याशिवाय पर्याय उरणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे मुक्ताईनगर विधानसभेतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधानसभा तिकिट वाटप होताना भाजपला ही जागा मिळेलच याची काही शाश्वती नाही. त्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील उमेदवारांना तिकिट वाटण्याची संधी रोहिणी खडसे यांना मिळेल त्यामुळे रोहिणी खडसे यांनी सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत थांबण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय.
गिरीश महाजन यांचा करिश्मा कमी झालाय?
एकनाथ खडसे भाजपमध्ये गेल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे भाजपचं नेतृत्व म्हणून प्रामुख्यानं गिरीश महाजन यांच्याकडे पाहिलं जातं होतं. महाजन खडसे संघर्षांचे अनेक अंक जिल्ह्यानं आणि राज्यानं पाहिले. गिरीश महाजन यांच्याच माध्यमातून जिल्ह्यातील जिल्हा बँकेपासून दुधसंघाच्या निवडणुकीपर्यंत सर्व बाबी ठरवण्यात येत होत्या. त्यामुळे आपोआपच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गिरीश महाजन यांचाच उमेदवार ठरवण्यात वरचष्मा असणार यात कोणतीच शंका नव्हती. परंतु सर्वांना अचानक आश्चर्याचा धक्का बसला कारण जळगाव लोकसभा असो की रावेर लोकसभा असोत गिरीश महाजन यांना अपेक्षित उमेदवार देण्याऐवजी पक्षाच्यावतीने दुसऱ्याच उमेदवारांना संधी देण्यात आली. ही बाब गिरीश महाजन यांच्या नेतृत्वालाच थेट धक्का देणारी असल्याचं यावरुन स्पष्ट झालं. कदाचित महाजन यांचा करिश्मा जळगाव जिल्ह्यात काम करणार नाही हे लक्षात आल्यामुळेच थेट पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ खडसे यांच्याशी बातचीत सुरु केली आणि परिणामी आता एकनाथ खडसे कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करत स्वगृही परततील. दुसरीकडे पदाधिकाऱ्यांना राजीनामे द्यायला लावून एकप्रकारे वरिष्ठ नेतृत्वाकडे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या उमेदवाराबाबत नाराजी असल्याचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र याचा कोणताच फायदा याठिकाणी होताना पाहिला मिळत नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, कोणत्याही परिस्थितीत रक्षा खडसे या निवडून यायला हव्यात, अशी तंबीच वरिष्ठांनी गिरीश महाजन यांना दिल्याची माहिती आहे.
खडसेंचा भाजप प्रवेश महाराष्ट्रातील नेत्यांची मात्र चुप्पी
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होत असताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी मात्र चुप्पी साधल्याचं पाहायला मिळत आहे. कारण महाराष्ट्रातील भाजपचं काम सध्या ज्या नेत्याभवती फिरतं, त्या नेत्याला नाथा भाऊंचा प्रवेश नक्कीच रुचणारा नाही. केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेतृत्वाच्या पुढे एक पाऊल टाकत आता हा प्रवेश करुन घेण्याचा निर्णय आहे. यासाठी केंद्रीय पातळीवर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चेहऱ्याने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती आहे. या नेत्यानं आत्तापर्यंत मागच्या पाच वर्षात ज्यांना डावललं गेलं त्या सर्वांना पुन्हा मूळ भाजपशी जोडण्याचा आणि उचित सन्मान करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये नुकत्याच राज्यसभेवर गेलेल्या मेधा कुलकर्णी, पंकजा मुंडे आणि आता एकनाथ खडसे यांचं उदाहरण ताजं आहे.













