धाराशिवमध्ये पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? पडद्यामागची कथा ओमराजेंनी सांगितली 

0

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. धाराशिव येथे कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मतदारसंघातील विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अपयश आणि वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. आदरणीय उद्धवजी, आदित्यजी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह मला कायम मिळाला आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कधीही कटुता नव्हती आणि यापुढेही राहणार नाही. मातोश्रीबद्दल आमच्या कार्यकर्त्यांकडून एकही अपशब्द जाऊ नये, अशी सूचना मी सर्वांना दिली आहे.

अधिक वाचा  दोघांचा पाठलाग, भररस्त्यात गोळ्या, ओमराजेंना आज न्याय मिळेल? 20 वर्षानंतर वडिल पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचं गूढ उलगडणार

ठाकरे कुटुंबीयांचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमीच मिळाले आहेत, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, मात्र सत्ते अभावी अपेक्षित यश मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, धाराशिवमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पराभव झाला.

सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही सत्तेअभावी विकासकामे रखडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वडिलांच्या हत्येच्या प्रकरणातील न्यायालयीन निकालावरही त्यांनी भाष्य केले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  किशोर साळवी यांचा टेनिस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र पोलिसांकडून गौरव

आम्हाला कोणताही विशेष लाभ नको, फक्त न्याय हवा आहे. गेली २० वर्षे आम्ही न्यायासाठी संघर्ष करत आहोत. या प्रकरणात सीबीआय अपील करणार असून सत्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. ओमराजे यांनी स्पष्ट केले की, आपण पद, पैसा किंवा कोणत्याही दबावामुळे हा निर्णय घेतलेला नाही. माझ्यावर ईडी, सीबीआय किंवा अन्य कोणत्याही चौकशीचे दडपण नाही. मी 2006 पासून सर्वसामान्य माणसासाठी काम करत आलो आहे.

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी आणि प्रशासनाची साथ आवश्यक असते. सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मी पद किंवा पैशासाठी राजकारण करत नाही. सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करणार असून शिंदेंच्या नेतृत्वात अधिक प्रभावीपणे काम करू,” असे आश्वासनही ओमराजे निंबाळकर यांनी दिले.

अधिक वाचा  सिंहगड, वारजे कोथरूडमध्ये रिमझिम सरी, उकाड्याने हैराण पुणेकरांना अखेर दिलासा! विश्रांतवाडीतही पावसाची हजेरी

माझा पुढील राजकीय प्रवास हा सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद, विकास आणि न्याय मिळवून देण्यासाठीच असेल. ज्या तळमळीने आतापर्यंत काम केले, त्याच निष्ठेने आणि अधिक ताकदीने पुढेही काम करत राहीन, असे आश्वासन देत ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट केली.