राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी महायुती सरकारवर टीका करत हे सरकार जनतेच्या प्रश्नांपासून दूर असून, ‘महायुती नव्हे, तर ५६ टक्के कमिशन सरकार’ असल्याचा आरोप केला. राज्यात सुका दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली.






पत्रकार परिषदेला काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)चे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, तसेच उद्धवसेनेचे भास्कर जाधव, अंबादास दानवे, अनिल परब आणि सुनील प्रभू उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, जून महिना अर्धा संपला तरी राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. ‘एल निनो’चा परिणाम होण्याची शक्यता सरकारला आधीपासून माहीत असतानाही पाणी नियोजनासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात सुका दुष्काळ जाहीर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गळती, राज्यभर वाढलेले अमली पदार्थांचे जाळे, जंगलतोड, देवस्थान जमिनींचे प्रश्न आणि विविध कथित घोटाळ्यांवर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.












