राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपत प्रवेश करणार आहेत. स्वतः एकनाथ खडसे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. एकीकडे एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर असताना मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यासह भाजप सोडून गेलेल्या उन्मेष पाटील यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसेंना आपल्या घरात पद पाहिजे असल्याने 2019 मध्ये हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापले गेल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला आहे.






गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका
मी म्हणजे भाजप म्हणणारे त्यांचे काय झाले. आज त्यांच्याकडे काहीच नाही. त्यांना कुणी विचारत नाही, अशी टीका त्यांनी एकनाथ खडसेंवर केली आहे. दिवंगत हरिभाऊ जावळे (Haribhau Jawale) यांचे देखील तिकीट खडसेंच्या आग्रहामुळे कापले गेले. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत देखील त्यांचा घात झाल्याचा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
आता बघा कसा उबाठाचा फफुटा उडतो – गिरीश महाजन
उन्मेष पाटील यांना भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. नुकताच त्यांनी भाजपला रामराम ठोकत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, तुम्ही शिवसेना ठाकरे गटात गेले आता बघा कसा उबाठाचा फफुटा उडतो, अशी टीका गिरीश महाजनांनी केली आहे.
गिरीश महाजनांचे उन्मेष पाटलांना आव्हान
मोठे मोठे नेते थप्पीला लागले आहेत. तुमचं तर काहीच नाही. जर तुमची इकडे ताकद होती, काम केले आहे तर स्वतः लोकसभा लढवायची होती, यांच्या त्याच्या खांद्यावर का बंदूक ठेवली, असे आव्हान गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटलांना दिले आहे. मागच्या वेळी स्मिता वाघ यांचे ऐनवेळी तिकीट कापले पण त्यांनी पक्ष सोडला नाही. यावेळी तुम्हाला तिकीट दिले नाही तर लगेच पक्ष सोडला. वेगळ्या पक्षात गेले.
अमोल जावळे भाजप सोडून जाणार नाही
आता चालले आहे त्यांचे माझा मित्र, निवडून येण्यासारखी परिस्थिती असती तर उन्मेष पाटलाने तिकीट घेतले असते. मात्र परिस्थिती विरुद्ध आहे. म्हणून करण पवारांची निवड करण्यात आली आहे. अमोल जावळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र अमोल जावळे यांनी मला मी भाजप सोडून जाणार नाही. माझी पक्षावर निष्ठा आहे, असे सांगितल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.











