‘यशवंत’च्या आतुरलेल्यांचा प्रस्थापितावर रोष; 18-3 ने आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा मोठा विजय

0

यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21जागांसाठी दोन प्रमुख पॅनेलमधील 42 उमेदवारांसह तब्बल 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. संचालक मंडळाची प्रत्यक्ष निवडणूक पार पडली. यशवंत साखर कारखाना बंद पाडण्यास कारणीभूत असल्याचे मनात धरून प्रस्थापित कारभाऱ्यांवरील रोष मतदानातून व्यक्त करत सभासदांनी अखेर त्यांना आपली जागा दाखवली.

आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने २१ पैकी १८ जागांवर विजय मिळवीत कारखान्याच्या उध्दाराचा विडा उचलण्यात यश मिळविले आहे. आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. शीतल पाटील यांनी काम पाहिले.

या निमित्ताने पॅनेलप्रमुख व कृषीउत्पन्न बाजारसमितीचे संचालक प्रकाश जगताप यांच्यासह माजी सभापती प्रताप गायकवाड, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व माजी पंचायतसमिती सदस्य बाळासाहेब हे चौधरी किंगमेकर ठरले आहेत. त्यांनी विरोधी पॅनेलप्रमूख कारखान्याचे माजी चेअरमन माधव काळभोर, प्रा. के. डी. कांचन, महादेव कांचन, कृषीउत्पन्न बाजारसमितीचे सभापती दिलीप काळभोर, माजी सभापती रोहिदास उंद्रे, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर या मात्तबरांना तीन जागांवर रोखून धरत मोठा धक्का दिला आहे.

उरुळी कांचन-शिंदवणे गट क्रमांक १ मधील शेतकरी विकास आघाडीचे संतोष कांचन, सुनिल कांचन आणि सुशांत दरेकर हे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांना अनुक्रमे ५६७०, ५४९६ व ५०८० इतकी मते मिळाली आहेत. पराभूत उमेदवार विकास आतकिरे यांना ४८६५ , अजिंक्य कांचन यांना ४४९७ तर अमित कांचन यांना ४१९६ एवढी मते मिळाली आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

सोरतापवाडी, नायगाव व कोरेगावमूळ गट क्रमांक २ मधून शेतकरी विकास आघाडी” चे शशिकांत चौधरी ५२०१, विजय चौधरी ५३०५ व ताराचंद कोलते ५१९० इतकी मते मिळवून विजयी झाले आहेत. रयत सहकारी पॅनेलच्या राजेंद्र चौधरी यांना ४७२८, मारुती चौधरी यांना ४३३७, लोकेश कानकाटे यांना ४४९९ मते मिळाल्याने या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे.

लोणीकाळभोर – थेऊर गट क्रमांक ३ मधून शेतकरी विकास आघाडी” चे उमेदवार मोरेश्वर काळे यांनी ५२६८ तर योगेश काळभोर यांनी ४९५१ मते घेऊन विजय मिळवला. येथै रयत सहकार पॅनेलचे उमेदवार थेऊरचे माजी सरपंच नवनाथ काकडे यांनी ५१३१ मते घेऊन विजय मिळवला. त्यांच्या पॅनेलमधील उमेदवार आप्पासाहेब काळभोर व राहुल काळभोर यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना अनुक्रमे ४७९९ व ४३३० मते मिळाली. आघाडीच्या अमर काळभोर या उमेदवाराला येथे पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना ४३३० मते मिळाली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मांजरी बुद्रुक – फुरसुंगी गट क्रमांक ४ मधील शेतकरी आघाडीचे उमेदवार माजी उपसरपंच राहुल घुले यांनी ५५०२ तर अमोल हरपळे यांनी ५४०८ मते मिळवून विजय संपादन केला. गटातील रयत सहकारी पॅनेलचे उमेदवार कारखान्याचे माजी संचालक राजीव घुले पाटील व सुरेश कामठे यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना अनुक्रमे ४७७४ व ४४८० मते मिळाली.

मांजरी खुर्द – कोलवडी – वाघोली गट क्रमांक ५ मधून शेतकरी आघाडीचे उमेदवार किशोर उंद्रे यांनी ५२१२ तर रामदास गायकवाड यांनी ५२६२ मते घेऊन विजय मिळवला गटातील रयत सहकारी पॅनेलचे उमेदवार कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे तसेच आनंदा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना अनुक्रमे ५१२० व ४१०० मते मिळाली.

गट क्रमांक ६ मधून शेतकरी आघाडीचे उमेदवार सुभाष जगताप ५४६६ तर रयत सहकारी पॅनेलचे उमेदवार श्यामराव कोतवाल ४८९८ मते मिळाल्याने विजय झाले आहेत. शेतकरी विकास आघाडीचे रमेश गोते यांना ४७११ तर रयत सहकारी पॅनेलचे दीपक गावडे यांना ४६९२ मते मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

कारखान्याच्या ‘ब’ वर्ग गटातील आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेलचे उमेदवार सागर काळभोर हे २०२ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना विरोधी उमेदवार संजय गायकवाड यांनी सुरूवातीलाच पाठिंबा जाहीर केला होता.

महिला राखीव गटातून शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवार रत्नाबाई काळभोर यांनी ५६४१ तर हेमा काळभोर यांनी ५४४५ इतकी मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी रयत सहकारी पॅनेलच्या सुरेखा घुले व संगिता काळभोर यांचा पराभव केला. त्यांना अनुक्रमे ४४०६ व ४७६४ अशी मते मिळाली.

इतर मागासवर्ग गटात शेतकरी आघाडीचे उमेदवार मोहन म्हेत्रे यांनी ४६१८ मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी रयतच्या रोहिदास टिळेकर यांचा पराभव केला. टिळेकर यांना ४१५९ मते मिळाली.

अनुसूचित जाती गटात शेतकरी आघाडीचे उमेदवार दिलीप शिंदे यांनी ५६९५ मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी रयतच्या संजय वेताळ यांचा पराभव केला. वेताळ यांना ४८७७ मते मिळाली.

विमुक्त जाती गटात शेतकरी आघाडीचे उमेदवार कुंडलिक थोरात यांनी ६०७५ मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी रयतच्या मारूती थोरात यांचा पराभव केला. त्यांना ४६७३ मते मिळाली.