सत्ताकृपेने आज ‘सुंदर'(धोकादायक) निवास झळाळले; कत्तल सोसलेल्या ‘औदुंबरा’चे डोळे मात्र आजही ओले

0

सत्ता म्हणजे काहीही करण्याचा अधिकार! ज्याचा वशिला त्याची म्हैस काशीला! तुमचं आमचं जमलं मग प्रशासनही हलल! अशा प्रकारच्या अनेक म्हणी सत्ताधारी आणि त्यांच्याशी सलगी करणाऱ्या लोकांच्या बाबतीत वारंवार बोलल्या जातात. कोथरूडच्या मुख्य रस्त्यावर आणि नामांकित हॉटेलच्या शेजारी एक अडगळीत पडलेली बिल्डिंग नाव ‘सुंदर निवास’! तसे तर या इमारतीला पुणे महानगरपालिकेने 2012 मध्येच धोकादायक म्हणून जाहीर केल्याची चर्चा सर्व कोथरूडमध्ये आहे. सध्या केंद्र राज्य सरकार ताब्यात असलेल्या अन्  प्रशासकमार्फत पुणे महापालिकेच्या चाव्याही ताब्यात असलेल्या पक्षाच्या संपर्क कार्यालयासाठी या इमारतीचा वापर करण्याचे निश्चित झाले आणि पुन्हा या इमारतीला झळाळी येण्यास सुरुवात झाली.  हळूहळू रंगरंगोटी झाली आणि रात्र दिवस कारागीरांनी कष्ट करून चकाकीही आणली. मग नव्यारूपातील ‘नामफलक’ही झळकले, थाटामाटात उद्घाटन झाले आणि अन् अचानक फांदी पडल्याचे निमित्त अन् थेट हिवाळी अधिवेशनातूनच सूत्र हलली आणि कत्तल औदुंबराची झाली! या घटनेला तब्बल २आठवड्याचा अवधी झाला असला तरी औदुंबराच्या अश्रू अजूनही वाहत आहेत. सत्ताधारी लोकांना ऑफिस खुले झाल्याचा आनंद! जागा मालकाला बिल्डिंग चमकल्याचा आनंद पण औदुंबराच्या नशिबी अजूनही अश्रूधाराच!

अधिक वाचा  पुण्यात 13 मृत्यूंचं गूढ उलगडलं! घरातच होता ‘मृत्यूचा कारखाना’, कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार मुख्य आरोपीसह 6 जण जेरबंद

सत्तेचा फायदा कधी कोणाला होईल याची प्रचिती सध्या कोथरूड भागामध्ये एक औदुंबराला अन् नामांकित हॉटेलच्या शेजारी एक अडगळीत पडलेल्या नाव ‘सुंदर निवास’ ला येत आहे. मुळात वारसाचे वाद, जिर्णावस्थेत असलेले कमकुवत बांधकाम अन् पुणे महापालिकेतर्फे वापरास अयोग्य दाखला दिल्यानंतरही या इमारतीचा मोठा दिमाखात पुनर्वापर सुरू झाला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशीही वारसाची फ्री स्टाईल झाली पण सत्तेपुढे कुणाचं चालतं का? या सर्व गदारोळात मोठ्या थाटामाटात उद्घाटनही झालं अन् कार्यकर्त्यांची नारेबाजीही झाली.

नामांकित हॉटेलच्या शेजारी एक अडगळीत पडलेली बिल्डिंग ‘सुंदर निवास’ चा पुनर्वापर सुरु झाला! वारसाचे वाद बाजूला गेले. पण इमारतीच्या कडेल्या असलेल्या वाढलेल्या झाडांची अडचण माञ भासू लागली. विशेष म्हणजे कोणतंही वादळ वारे अन् पाऊसही नसताना एकाच दिवसात मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दोन फांद्या तुटून पडल्या. मग खबर थेट हिवाळी अधिवेशनात गेली अन् अतीवेगात सूत्रे हलली. मोठं अधिकारीही आले अन् पुढे काय….. आजपर्यंत मुख्य प्रवेशद्वारावर सत्ताकृपेने कत्तल सोसलेला ‘औदुंबर’ मात्र आजही विहळतोय!

अधिक वाचा  मुसळधार पावसाचा २१ जिल्ह्यांना अलर्ट; ताशी ७० च्या स्पीडने येतंय तुफान, येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस

तळटीप: या वृत्तामध्ये विशेष म्हणजे कोणाची प्रतिक्रियाही घेण्यात आली नाही शक्यही होते! पण  कागदी घोडे वेदना थांबवू शकत नाहीत. घडलेली घटना महत्त्वाची! कारवाई होईल किंवा नाही होईल हे अलहिदा!