‘बीआरएस’ चे महिना ३ लाख पॅकेज; महाराष्ट्राचे हे कल्चर नाही म्हणूनच ‘प्रवेशा’ची गर्दी; रोहित पवार

0

आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील भारत राष्ट्र समिती अर्थात ‘बीआरएस’ या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे. यासाठी ‘बीआरएस’ने राज्यात मोठी मोर्चे बांधणी करण्यास सुरवात केली असून मराठवाड्यासह सोलापुरातील शेकडो कार्यकर्त्यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला.

त्यानंतर आज अहमदनगरच्या श्रीगोद्यातील राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार यांनीही बीआरएसमध्ये जाहिर प्रवेश केला. ‘बीआरएस’ने आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, आता ‘बीआरएस’वर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला असून महाराष्ट्रात ‘बीआरएस’चे कल्चर टीकणार नाही, असा टोला लगावला. एका वृत्तवाहीनीशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेशासाठी होत असलेल्या गर्दीचे कारणही सांगितले आहे.

अधिक वाचा  पाकिस्‍तानची मस्‍ती कायम ‘जैश’ला २५ कोटी रोख आणि ११ कोटी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये उद्ध्वस्त अड्डा पाकने पुन्हा उभारला

यावेळी त्यांनी ‘बीआरएस’ पक्षावर मोठे आरोपही केले. रोहित पवार म्हणाले, “‘बीआरएस’मध्ये सध्या महाराष्ट्रातील अनेक लोकं प्रवेश करत आहेत. पण बाहेरचे लोकं महाराष्ट्रात आले तर त्यांना महाराष्ट्राचे विचार कळणार नाहीत. ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केलेल्या एका पदाधिकाऱ्याला एका महिन्याला तब्बल तीन लाख रुपये पॅकेज असून महाराष्ट्रात हे कल्चर फार काळ टीकणार नाही”, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

दरम्यान, ‘बीआरएस’ने आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठा प्लॅन तयार केला असून त्या दृष्टीने ‘बीआरएस’ पक्ष महाराष्ट्रात पक्ष संघटन मतबूत करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ‘बीआरएस’चा फटका राज्यातील काही राजकीय पक्षाला बसू शकतो, असं काही राजकीय जाणकार सांगतात. पण असं असंल तरी रोहित पवारांनी ‘बीआरएस’वर केलेल्या आरोपाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

अधिक वाचा  पुण्यातील मिठाई दुकानावर कारवाई तुकाराम मुंढेंना महागात पडली! हायकोर्टाचे 5 लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश