बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून 290 किमीवर; केरळ, गुजरात महाराष्ट्रात वादळाचा मोठा परिणाम

0

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र झाले आहे. त्याचा परिणाम केरळ आणि मुंबईच्या समुद्रात दिसू लागला आहे. भरती-ओहोटीच्या वेळी येणाऱ्या उंच लाटा समुद्रात उसळत आहेत. बिपरजॉय मुंबईपासून 290 किमीवर आहे. चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यासह पावसाच्या हालचालीही सुरू आहेत. काल रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीवर जणार आहे.

दोन दिवस राज्यात पाऊस
बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत आहेत. चक्रीवादळामुळे जहाजे सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. मुंबई हवामान विभागाने चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक शहरांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. केरळ, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत वादळाचा परिणाम दिसत आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने संत गाडगे महाराजांचा १५० व्या जयंती महोत्सव केंद्रीय कार्यालयात संपन्न

गुजरातमध्ये टीम तयार
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधून पाकिस्तानकडे जाणार आहे. १५ जूनपर्यंत चक्रवादळाचा धोका कायम असून त्यानंतर तो कराचीत पोहचणार आहे. वादळामुळे होणाऱ्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकारने एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम तयार ठेवली आहे. या चक्रीवादळामुळे १५ जून रोजी सौराष्ट्र अन् कच्छ भागांत 125-130 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

वादळ आणखी तीव्र होणार
बिपरजॉय चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका गुजरातच्या किनारपट्टीवर बसणार आहे. पुढील काही तासांत हे वादळ तीव्र होणार आहे. या वादळामुळे वारे 125 किलोमीटर ते 150 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहणार आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर त्याचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर हे वादळ पाकिस्तानकडे जाणार आहे. १५ जूनपर्यंत या वादळाचा अरबी समुद्रात मुक्कम आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई, कोकण किनारपट्टीला वादळाचा धोका नसला तरी समुद्राच्या अंतरंगात बदल होणार आहे. यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्र खवळलेला असल्याचा पाहायला मिळत आहे. उंच लाटा देखील समुद्रातून बाहेर पडत आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल झालेला आहे.