मविआ समर्थकांचा समृद्धीवर भीषण अपघात; कारचा टायर फुटला २ जागीच मृत्यू तर २ गंभीर

0

नागपूर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा रविवार, १६ एप्रिल रोजी नागपुरात होत आहे. त्यासाठी राज्याच्या काही भागातून मविआ समर्थक नागपुरात दाखल होऊ लागले आहेत. अशातच मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या एका कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. मात्र, चालक थोडक्यात बचावला आहे. त्याला किरकोळ जखमा झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, पाच जण कारने मुंबईहून नागपूरकडे निघाले होते. धामणगावजवळ समृद्धी महामार्गावर नांदगाव खंडेश्वर ते कारंजा दरम्यान हा अपघात झाला. कारचा टायर फुटला आणि कार दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने गेली. यावेळी नागपूरच्या दिशेने येणारी कार मुंबईच्या दिशेने वळाली. अपघातग्रस्त कारचा वेग १२० किमी प्रतितासापेक्षा जास्त होता, अशी माहिती असून कारमधील पाच जण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  पंजाबमध्ये भाजपचा दणदणीत पराभव! ‘आप’चा 900 जागांवर विजय, काँग्रेस ही दुसरे स्थान मिळवत समाधानी?

अपघातानंतर यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी तालुक्यातील अहेर अल्लीचे सरपंच हितेश राऊत, सचिन डफे, अमरावती वाहतूक विभागाचे काही अधिकारी आणि पोलिसांनी तेथे पोहोचलेल्या जखमींना उचलून रुग्णवाहिकेत बसवले. डॉक्टर आणि रस्ता सुरक्षेसाठी तैनात असलेले लोक मृत व जखमींना उचलू शकले नाहीत, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. रविवारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे. सभेला अजून तीन दिवस उरले आहेत. मात्र विदर्भातील पर्यटनासाठी काही लोक आधीच नागपुरात येत आहेत. ही मंडळी त्यातलीच एक होती. दरम्यान, जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात टायगर सफारीसाठी त्यांची नोंदणी झाली होती. याशिवाय नागपूरच्या आसपास इतर ठिकाणीही दौरे करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र नागपूरला पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. मृत व जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

अधिक वाचा  रुद्रम-II मिसाइलची यशस्वी चाचणी सुखोई-30 मधून शूट होताच थेट टार्गेट उद्धवस्त, सुरक्षा कवच भेदणं या सिस्टिममुळे शक्य