‘राजकारणात सत्य सांगणं काही कामाचं नसतं’, नितीन गडकरी मनमोकळेपणाने हे काय बोलले?

0

नाशिकच्या मोहाडी परिसरातील नामांकित सह्याद्री फार्म कंपनीच्या परिसरात बायोगॅस ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी राजकारणात सत्य सांगणे काही कामाचं नसतं, असं म्हटलं. नितीन गडकरी आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पणाच्या कार्यक्रमात हजेरी लावलेली. या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी आपण गोपीनाथ मुंडे आणि लालकृष्ण आडवाणी या दोनच नेत्यांना वाकून नमस्कार केल्याचा किस्सा सांगितलेला. ते मोकळेपणाने बोलतात. या कार्यक्रमानंतर मोहाडी येथील कार्यक्रमातही त्यांनी मोकळेपणाने भाषण केलं.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

“हा सह्याद्री फार्म प्रकल्प म्हणजे शेतकरी काय चमत्कार करू शकतो, याचे उदाहरण आहे. प्रत्येक जिल्ह्यात जर असे सह्याद्री सारखे प्रकल्प झाले तर नक्कीच आपला देश जगात नंबर एक होईल. कुणीही व्यक्ती परफेक्ट नाही. त्यामुळे प्रबोधन, प्रशिक्षण आणि रिसर्च याचा वापर करा. यश, ज्ञान यांवर कुणाचंही पेटंट नसतं. मी शरद जोशी यांच्या विचारांचे समर्थन करतो. ते नेहमी सत्य सांगायचे. पण राजकारणात सत्य सांगणे, काही कामाचं नसतं”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“लेह आणि लडाखमध्ये 30 ठिकाणी फॅनिक्युलर रेल्वे बांधण्याचे काम सुरू आहे. आम्ही नागपूरमध्ये केसांपासून अमिनो अॅसिड बनवले. उत्पादन खर्च कमी करणे, क्वालिटी वाढविणे, उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. इथेनॉल इंधनाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. नाशिकला जर ड्रायपोर्ट झाले तर तुम्हाला जेएनपीटी इथे जायची गरज नाही”, असं गडकरी म्हणाले.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

“औरंगाबादवरून पुण्याला दीड तासांत जाण्यासाठी प्रकल्प करण्याची तयारी सुरू आहे. आम्ही दिल्ली ते डेहराडून दोन तासांत जाण्यासाठी रस्ता बांधत आहोत. शेतकऱ्यांनी बांबूपासून डांबर बनविण्यासाठी प्रयत्न करावे. दरवर्षी रस्ते होतात. खड्डे पडतात. त्यात अधिकारी खुश. ठेकेदार खुश आणि आम्हीही खुश”, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी नितीन गडकरी यांनी केली.