गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र राज्यातील 36 हजाराहून अधिक कंपन्या बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील 36 हजारांवर कंपन्या बंद झाल्याची माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. एक दिवस द्या, मी तपासून सांगतो अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.







मी केंद्र सरकारला चुकीचे ठरवत नाही, पण…
दरम्यान, केंद्र सरकारने 36 हजाराहून अधिक कंपन्या बंद झाल्याचे सांगितले असले तरी महाराष्ट्राची स्थिती मला बघावी लागणार आहे. मी केंद्र सरकारला चुकीचे ठरवत नाही, पण मला याची तपासणी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील एकही उद्योग बाहेर गेलेला नाही
दरम्यान, चाकण औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. चाकण औद्योगिक वसाहतीतील एकही उद्योग बाहेर गेलेला नाही. ठाकरे सेनेने याचा मोठा गाजावाजा केला. मात्र तसे काहीही नाही. उलट काही कंपन्यांनी विस्तारासाठी अधिक जागेची मागणी आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. उषा चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी स्वतः चव्हाण यांनाही बोलेन आणि त्यांची काय समस्या आहे, ते जाणून घेऊन, असे सामंत म्हणाले.
जरांगे पाटील नाराज का आहेत? यावर त्यांच्याशी चर्चा करुन गैरसमज दूर करु
सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी रद्द करण्याच्या मुद्यावरुन त्यांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. यावर मंत्पी उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटलांची नाराज का आहे, यावर त्यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करु, असे सामंत म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न कुणी केले असतील तर ते एकनाथ शिंदे यांनी केले आहेत असे सामंत म्हणाले. मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करेन आणि आतापर्यंत किती लोकांना जात प्रमाणपत्र दिले, याचा अहवाल त्यांना देईन, असे सामंत म्हणाले.













