पुणे मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत (एसआयआर) जिल्ह्यात वितरण केलेल्या एकूण अर्जांपैकी २५ लाख अर्ज संकलित (अनकलेक्टेबल) झालेले नाहीत. मयत, दुबार, स्थलांतरित आणि नाॅट रेडी टू साईन, अनुपस्थित अशा विविध कारणांमुळे हे अर्ज संकलित झाले नसून, २५ लाख मतदार यादीतून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. हडपसर, खडकवासला आणि कोथरूडमध्ये असा अर्जांची संख्या सर्वाधिक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडील आकडेवारीवरून अधोरेखित झाले आहे.







मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे (एसआयआर) काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) आतापर्यंत ८७ लाख ९६ हजार ६२४ म्हणजेच ९६.८८ टक्के इतक्या अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५९ लाख ५० हजार ४८० अर्थात ६५.५३ टक्के अर्जांचे ‘डिजिटायझेशन’ करण्यात आले आहे. २५ लाख ५ हजार ३८३ इतके अर्ज हे ‘अनकलेक्टेबल’ या वर्गवारीत टाकण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २७.५९ टक्के इतके असून, एवढे मतदार अंतिम मतदारयादीतून वगळण्याची शक्यता आहे.
यामध्ये सुमारे अडीच लाख मतदार हे मयत, १० ते ११ लाख दुबार तसेच सुमारे १० लाख मतदार हे स्थलांतरित आणि उर्वरित अनुपस्थित अशा एकूण २५ लाखांहून अधिक अर्जांचा समावेश आहे. हे अर्ज वगण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला आहे. प्रत्यक्षात ९० लाखांपैकी ८७ लाख मतदारांपर्यंत ‘बीएलओ’ पोहोचल्याचा दावा निवडणूक शाखेने केला असून, त्या अर्जांचे वाटपही करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापैकी दुबार, मयत, स्थलांतरित,’नॉट रेडी टू साईन’ आणि अनुपस्थित अशा पाच वर्गांमध्ये समाविष्ट असलेले मतदार अर्थात त्यांचे अर्जच हे ‘अनकलेक्टेबल’ वर्गात मोडत असल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदविले आहे.अर्ज संकलित करता न येणाऱ्या या वर्गवारीतील अर्जांचे प्रमाण पुणे शहरातील मतदारसंघांत सर्वाधिक आहेत. त्यात हडपसरमध्ये २ लाख ८७ हजार ४५०, खडकवासल्यात २ लाख ४५ हजार ६८३, चिंचवडमध्ये २ लाख २१ हजार ५०२, वडगाव शेरीत २ लाख १० हजार ३२०, तर कोथरूडमध्ये १ लाख ७६ हजार ७० अर्ज असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने अहवालात केली आहे.
सर्वाधिक कमी संकलन करता न येणाऱ्या अर्जांमध्ये कसबा पेठेतील ४६ हजार ७२४ अर्ज, पर्वतीमध्ये १ लाख २८ हजार ८९१ अशा अर्जांचा समावेश आहे. एकूण वितरीत ८७ लाख अर्जातून २५ लाखांचे अर्ज वगळल्यास सुमारे ६२ लाख अर्जांचे संकलन योग्य असल्याचे स्पष्ट होते.
‘बीएलओ’ पोहोचले नसल्याच्या तक्रारी
जिल्हा प्रशासनाच्या १० ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ९० लाख ८० हजार १७३ मतदारांपैकी ९६.८८ टक्के अर्जांचे वितरण झाले आहे. उर्वरित २ लाख ८३ हजार ५४९ मतदारांना अर्ज मिळालेला नाही. अनेक ‘बीएलओ’ प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचले नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडे अर्ज देऊन वितरण पूर्ण झाल्याचे दाखविण्यात येत आहे.
‘मतदारांनी खातरजमा करावी’
एखाद्या मतदाराचे नाव वगळणे, समाविष्ट होण्यास संबंधित ‘बीएलओ’ हेच जबाबदार राहणार आहेत. त्यामुळे ‘बीएलओं’ना मतदारांच्या नावाची व्यवस्थित नोंद करा अशा सूचना देण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही वगळण्यात येणाऱ्या मतदारांची नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याची खातरमजमा मतदारांनी करावे, यादीत चुकून नाव असल्यास ‘बीएलओं’शी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा प्रशानसाकडून करण्यात आले आहे.













