राज्यात मान्सून सक्रीय झाला तरी अद्याप अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे. तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह काही भागात पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. आता पुढील चार ते पाच दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या चार दिवसात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
उत्तर महाराष्ट्रात बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात हलक्या ते मध्य सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात पावसाने दडी मारल्यानं तापमानात वाढ झाली असून नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.
मुंबईत बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. सोमवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र मंगळवारी दिवसभरात पाऊस पडला नाही. पुण्यातही हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.