भाजपने अभिजीत दीपकेंना आंदोलन थांबल्यानंतर घेरलं, जुन्या पोस्ट, फोटो “एकही थैले के चट्टे बट्टे!”

0

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला झुकावे लागले. नीट पेपरफुटीसह शिक्षणव्यवस्थेतील सुधारणांचा मुद्दा उपस्थित करत सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीत जंतरमंतरवर केलेल्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काही तासांतच भाजपने दीपकेंना घेरलं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. भाजपच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी दीपके यांच्या काही जुन्या पोस्ट व फोटो सोशल मीडियात पोस्ट करत त्यांच्यावर हल्ला चढविला आहे. या पोस्टमध्ये दीपके आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्यासोबत दिसत आहेत. तसेच आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करतानाचाही दीपकेंची जुनी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. एकही थैले के चट्टे बट्टे! असे म्हणत मालवीय यांनी दीपके आणि आपचे थेट कनेक्शन असल्याचे म्हटले आहे.

अधिक वाचा  म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजची कामे आवश्यक उपाययोजना करण्याच्या ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचना

आंदोलनाला अराजकीय चळवळ म्हणण्यापूर्वी या आंदोलनाच्या नेतृत्वाचा आम आदमी पक्षाशी (AAP) असलेला जवळचा संबंध ओळखणे महत्त्वाचे आहे. आंदोलनातील अनेक प्रमुख चेहरे केजरीवाल आणि सिसोदिया यांच्याशी दीर्घकाळ संबंधित होते. त्यांनी सोबत काम केले होते. विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त चळवळ म्हणून पुढे आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व हळूहळू विद्यार्थ्यांऐवजी अनुभवी राजकीय कार्यकर्त्यांकडे गेल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे.

आंदोलनातील प्रत्येकजण राजकीय हेतूने सहभागी झाला होता, असे नाही. अनेक तरुण खऱ्या चिंतेतून सहभागी झाले होते. अशा विद्यार्थ्यांबद्दल संशय नव्हे, तर सहानुभूती असली पाहिजे. मात्र, आता यापैकी अनेकांना जाणवेल की त्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या हितासाठी नव्हे, तर काही राजकीय शक्तींच्या हितासाठी झाला, असे म्हणत मालवीय यांनी थेट दीपके आणि त्यांच्या टीमवर राजकारणाचा ठपका ठेवला आहे.

अधिक वाचा  राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 पॉकेटमनी मिळणार?

विशेष म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनीही राजीनामा देताना आपल्या पत्रात आंदोलनामध्ये बाहेरील शक्ती घुसल्याचे सूचकपणे म्हटले होते. यापूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी आंदोलनाला परदेशातून मदत मिळत असल्याचा आरोप करत राजकीय नेत्यांशी कनेक्शन जोडले होते. आता आंदोलन थांबल्यानंतर पुन्हा एकदा भाजपकडून हल्ला सुरू झाला आहे.