सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं; अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

0

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. मध्यरात्री दीड वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

उपोषण स्थगित करण्याची घोषणा सोनम वांगचुक यांनी स्वतः एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टद्वारे केली. त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अभिजीत दिपके?

“२६ दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला असून आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. सोनम सर, आपल्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण संपूर्ण देशाच्या विवेकाला जागृत केले. आपले जीवन या देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांनी दिली आहे. दुसरीकडे जंतर मंतर येथे सुरू असलेले कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन मात्र सुरूच राहणार असल्याचे दिपकेंनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका अभिजीत दिपकेंनी घेतली आहे.

अधिक वाचा  पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट निर्माण होण्याची शक्यता पुढील एक महिना पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज

सोनम वांगचुक यांच्या ‘या’ अटी केल्या मान्य

  • २० जुलै रोजी शांततेने आंदोलन करून संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही.
  • परीक्षेसंदर्भात पेपरफुटी आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे.
  • नीट (NEET) पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचाही विचार केला जाईल.