‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थींचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या लाभार्थी निवडीत अधिक सावध भूमिका घेतली आहे. बँकांकडून प्राप्त झालेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या माहितीसोबत प्राप्तिकर भरणाऱ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची अंतिम यादी निश्चित केली जात आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानिमित्त आज (ता. २२) पहिली यादी जाहीर करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.







राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जाची माफी जाहीर केली आहे. त्यासाठी बँकांकडून लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, तिचे विश्लेषण सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेअंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये २० हजार कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. यापूर्वी सरकारने कर्जमाफीची अंमलबजावणी ३० जूनपर्यंत होईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर अधिवेशनात पाच जुलैची मुदत सांगण्यात आली; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब झाला. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत प्राप्तिकर विभागाच्या पडताळणीनंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थी अपात्र ठरल्याने सरकारने कर्जमाफीत अशा प्रकारची त्रुटी राहू नये, यासाठी महाआयटी आणि सहकार विभागामार्फत लाभार्थ्यांची सखोल पडताळणी सुरू ठेवली आहे.
दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारीच जाहीर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी मंत्री बाबासाहेब पाटील पूर्ण तयारी करत आहेत.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
शेतकऱ्यांनाही करावी लागणार पडताळणी
प्राथमिक लाभार्थी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बँकांच्या संगणकीय प्रणालीतील वैयक्तिक कर्जविवरणाची शेतकऱ्यांना पडताळणी करावी लागेल. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होऊन जुलैअखेर प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.













