केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी प्रचंड आशावादी, पार्थ पवार-प्रफुल पटेल दोघंही मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेल्या दोन गटांच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घेतलेल्या भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार या दोघांनाही मंत्रिपद मिळवण्यात रस आहे, परंतु या मुद्द्यावर पक्षात एकमत होत नसल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीतही पुन्हा दोन गट

अलिकडच्या काळात, एका बाजूला सुनेत्रा पवार व पार्थ आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल पटेल व सुनील तटकरे असे मतभेद स्पष्टपणे दिसून आले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कामकाजावर पार्थ पवाराची पकड घट्ट होत असल्यामुळे पक्षातील अनेक जण नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

अधिक वाचा  पुण्यात ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, लाईव्ह कॉन्सर्ट अन् राहुल गांधींचा थेट संवाद

पार्थ-फडणवीस भेट

पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी सांगितले. “पार्थ हे आमच्या पक्षाचे युवा नेते आहेत आणि ते राज्यसभेत राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात मला काहीही गैर वाटत नाही” असे ते म्हणाले होते.

उपाध्यक्षांचं सुनेत्रा पवारांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी १३ जुलै रोजी सुनेत्रा पवारांना लिहिलेले एक पत्र शुक्रवारी समोर आले. त्यातून पक्षांतर्गत असलेली फूट उघड झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान पार्थ पवार यांचा समावेश करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करावी, अशी मागमी आहेर यांनी सुनेत्रा पवारांना केली. पार्थ यांची राजकीय कारकीर्द संपवण्याच्या उद्देशाने पक्षातीलच काही लोक त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहेर यांनी केला.

अधिक वाचा  बिल न भरल्यास मृतदेह अडवण्यावरचा चाप उठणार? रुग्णांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावर टीका

‘पार्थ पवारांबद्दल गैरसमज पसरवलेत’

या पत्रात म्हटले आहे की, “दुर्दैवाने आपल्याच पक्षातील काही व्यक्तींकडून असे गैरसमज पसरवले जात आहेत की, पार्थ दादा पक्ष किंवा जनता यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. हे एक उघड गुपित आहे. केवळ ३८ वर्षे वय असलेल्या नेत्याबद्दल असे गैरसमज पसरवणे आणि त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु होण्याआधीच ती संपवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.” असेही पुढे म्हटले आहे.

“पार्थ यांच्यात राजकीय परिपक्वतेचा अभाव आहे, अशी प्रतिमा निर्माण केली गेली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले.” असा दावाही अहेर यांनी पत्रातून केला आहे.

अधिक वाचा  शिवसेनेची पाटीलकी कोणाकडे? सिब्बल यांचा अखेरचा मास्टरस्ट्रोक, हे मुद्दे खटलाच पालटतील? A टू Z माहिती

विलिनीकरणाच्या चर्चा सुरु

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीएतील घटकपक्षांशी जवळीक वाढत असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या शक्यतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. विलीनीकरणाबाबतच्या अशा कोणत्याही बैठका झाल्याचे यापूर्वी नाकारणाऱ्या तटकरेंनी अलिकडेच आपली भूमिका बदलली असून, आपल्याला या चर्चेची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.