पेठ – सांगली रोडवरील बसस्थानकाजवळ असलेल्या हॉटेल व लॉजिंगची इमारत अतिक्रमणात असल्याने ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांना अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी नगराध्यक्षपदासाठी अपात्र ठरविण्याचा आदेश दिला आहे.या प्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख घनश्याम उर्फ जयकर दिनकर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या निर्णयामुळे ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.







जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय मलगुंडे यांना मान्य नसल्यास १५ दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करण्याची मुभा मलगुंडे यांना दिली आहे. आता पुढील कायदेशीर आणि राजकीय घडामोडी काय घडणार कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जयकर जाधव यांनी मलगुंडे यांच्या बसस्थानकाजवळील इमारतीच्या बांधकाम परवानगी व नियमीतीकरणाबाबतची माहिती व बांधकाम नियमीतीकरणाबाबतचे जोडलेले सर्व कागदपत्रे, नकाशे याची सही शिक्क्यानिशी असलेली नक्कल माहिती अधिकारात मागवली होती.
माहिती अधिकारात मिळालेल्या सर्व प्रती जोडून जिल्हाधिकारी यांना हा अर्ज दिला होता. या अर्जाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेकडून अहवाल मागितला होता. अहवाल आल्यानंतर २४ मार्च २०२६ ला जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली सुनावणी झाली होती. मलगुंडे हे गेली कित्येक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक, नगराध्यक्ष व सध्याही नगराध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन ही इमारत बांधली आहे असे जाधव यांचे म्हणणे होते.
जाधव यांनी दाखल केलेल्या अर्जावर काल सुनावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कागदपत्रे, सातबारा उतारे, फेरफार नोंदी, नकाशे, भूअभिलेख विभागाचा अभिप्राय तसेच इतर पुराव्यांचे परीक्षण केले. त्यानंतर भूमापन क्रमांक ८/१अ, ८/१अ/१२, ८/१अ/१३, ८/१ब, ८/२ व ११ या मिळकतींमध्ये पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा निष्कर्ष आदेशात नोंदविण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांनी संबंधित ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमाच्या कलम ४४(१)(ई) मधील तरतुदीनुसार अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच, हा आदेश मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करण्याची मुभा संबंधितांना देण्यात आली आहे.
जयकर जाधव यांनी तक्रार दाखल करताना नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनिल मलगुंडे या दोघांचा उल्लेख केला होता. आजच्या सुनावणीत नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेचा आदेश देण्यात आला आहे. काही दिवसात सुनिल मलगुंडे यांच्याबाबतही सुनावणी होणार आहे. त्यात काय आदेश येणार या बाबतही उत्सुकता आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुखआमचे शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख घनश्याम उर्फ जयकर जाधव यांनी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अवैध आणि अनधिकृत बांधकामाबाबत अपात्रतेची मागणी करत अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर जिल्हाधिकारी यांनी योग्य निर्णय दिला आहे.













