महाराष्ट्रात पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत रेड अलर्ट राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल! 

0

महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या कोकण, घाटमाथा आणि किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे. आज पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, किनारपट्टी आणि घाटमाथ्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या पुणे आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर इतर ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे. घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील भिरा येथे २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली, तर लोणावळ्यात १०० मिलिमीटर पाऊस पडला. मुंबई आणि परिसरात सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. मान्सून वाऱ्यांची गती वाढल्याने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाला चांगला उधाण आला आहे. राज्यातील बहुतांश भागांत सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू असून, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे.

अधिक वाचा  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्रातही मोठी खांदेपालट; निष्क्रीयतेमुळे यांचं मंत्रिपद जाणार? नरेंद्र मोदीही भारतात परतणार

कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा भागात चांगला पाऊस अपेक्षित असला तरी पर्जन्यछायेच्या प्रदेशातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकरी, पर्यटक आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. हवामान विभागाने नागरिकांना पूरस्थिती, वाहतूक कोंडी आणि भूस्खलनाच्या धोक्याची जाणीव करून दिली आहे. पावसामुळे नद्या,धरणे आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पुढील काही दिवस हवामानात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.