सुनेत्रावाहिनी भाजपबद्दल पहिल्यांदाच थेट बोलल्या; ‘अधिवेशनानंतर 7 दिवसांत अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र, 2 महिन्यानंतरही..’

0

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थखातं त्यांच्याकडे घेतलं होतं. तसेच त्यांनी अधिवेशनात अर्थसंकल्पही सादर केला होता. त्यावेळी भाजपकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सात दिवसांत अर्थखातं देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, वारंवार याबाबत मागणी करुन आणि दोन महिने उलटूनही राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळालेलं नाही. यावरुनच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उघडउघड नाराजी बोलून दाखवल्याचं समोर आलं आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.26 मे) मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.आमदारांच्या याच बैठकीत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी अर्थखात्यावरून सरकार तसेच भाजपबाबत खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सुनेत्रा पवार यांनी भाजपकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सात दिवसांत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्याबाबत शब्द देण्यात आला होता. पण वारंवार विषय काढूनही मुख्यमंत्र्‍यांनी अद्यापही अर्थखात्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  भाजपकडे 17 पैकी 14 ठिकाणी बहुमत शिवसेना फक्तं या मतदारसंघात, तर राष्ट्रवादीकडे 2 मतदारसंघात बहुमत; कुणाचे किती आमदार वाढणार?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आजी-माजी आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.तसेच प्रमुख नेतेच या बैठकीला उपस्थित होते. मात्र,मुंबईत असूनही वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

तसेच याच बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्यात खटके उडाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांना आणखी हवा मिळाली आहे.

तटकरेंचा वादाचा मुद्दा…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वादळी बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वादाचा मुद्दा काढला. माझ्यासह प्रफुल पटेलांवर सातत्यानं टीका होत असताना कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नाही, अशी उघड नाराजी तटकरे यांनी बोलून दाखवली. प्रफुल पटेल आणि तटकरे यांनीच टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही? अशी विचारणाही तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचीही चर्चा आहे.

अधिक वाचा  खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार; संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव

चार प्रमुख नेत्यांवर मोठी जबाबदारी

तसेच प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पक्षातील चार अत्यंत अनुभवी आणि विश्वासू नेत्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवल्याचे बोललं जात आहे. यामध्ये प्रामुख्याने सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रकाश सोळंके, अनिल पाटील या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता या नेत्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आणि मुख्य चेहरे म्हणून समोर राहून प्रत्येक वादग्रस्त मुद्द्यावर पक्षाची अधिकृत आणि स्पष्ट भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या पदांच्या संभ्रमावर सारवासारव

गेल्या काही काळापासून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पक्षातील नेमक्या पदांवरून आणि अधिकारांवरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. कार्यकर्त्यांमध्येही यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. या बैठकीत सुनेत्रा पवारांनी या मुद्द्यावर सारवासारव केली. नेत्यांमधील अंतर्गत संबंध आणि पक्षातील पदे यावरून कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा  भाजपच्या विधान परिषदेच्या 12 जागांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी घेऊन रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

दरम्यान सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या आक्रमक बैठकीतून आगामी काळातील राजकारणाचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर न राहता थेट फ्रंटफूटवर येऊन खेळण्याच्या तयारीत आहे. या बैठकीनंतर आता छगन भुजबळ, सुनील तटकरे यांसारखे दिग्गज नेते मैदानात उतरून विरोधकांना कसे प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.