राज्यातील विधान परिषद निवडणुका बिगुल वाजल्यापासून कायम भाजपाशी जुळतं घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी सध्या राज्यात वेगळी भूमिका घेतली असून पक्ष वाढीच्या दृष्टीने पुन्हा एक पक्ष गळाला लावण्याचा हालचाली सुरू झाले आहेत. ठाणे विधानपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एक मोठं राजकीय धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाणे विधानपरिषद मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी आणि पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी आणखी एक राजकीय पक्ष थेट शिंदेसेनेत विलीन करून घेण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांची अनपेक्षित एन्ट्री होण्याची चर्चा आहे, यामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.






या नव्या राजकीय समीकरणामुळे शिंदेसेनेचे माजी आमदार फाटक यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता वसई विरारमधील क्षितीच ठाकूरही शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीत मतांची गोळाबेरीज वाढविण्यासाठी शिवसेनेकडून ही खेळी केली जात आहे. त्यामुळे माजी आमदार रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. उमेदवार म्हणून बविआचे क्षितिज ठाकूर यांची इंट्री होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केली.
बहुजन विकास आघाडी (BVA) शिंदे सेनेत विलीन होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई-विरार पट्ट्यात वर्चस्व असलेला हितेंद्र ठाकूर यांचा ‘बहुजन विकास आघाडी’ (बविआ) हा पक्ष शिंदे सेनेत विलीन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे विधानपरिषद निवडणुकीत मतांचे गणित जुळवण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून या मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
माजी आमदार रवींद्र फाटकांचा पत्ता कट?
या नव्या आणि अनपेक्षित राजकीय समीकरणामुळे शिंदे सेनेचे जुने आणि निष्ठावंत नेते माजी आमदार रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रवींद्र फाटक हे स्वतः या जागेसाठी इच्छुक असून त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली होती. मात्र, आता ऐनवेळी धक्कातंत्र वापरत एकनाथ शिंदे रवींद्र फाटक यांच्याऐवजी बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत प्रहार संघटनेच्या माध्यमातून धक्कातंत्र वापरण्यात आले होते, अगदी त्याच धर्तीवर यावेळेस थेट बहुजन विकास आघाडीला पक्षात विलीन करून घेत क्षितीज ठाकूर यांना रिंगणात उतरवण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.













