निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेचा १७ जागांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या १८ जूनला मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या ह्या १७ जागांची निवडणूक ही सत्ताधारी महायुतीमध्ये विधानपरिषदेतला मोठा भाऊ कोण ही ठरवणारी आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि पंचायत समिती सदस्यांमधून होणारी ही निवडणूक २०२९ ची पहिली सेमीफायनल ठरणार आहे. मात्र ही निवडणूक विरोधक नाही तर सत्ताधारी महायुतीच्याच अंतर्गत संघर्षासाठी सर्वाधिक चर्चेत राहण्याची दाट शक्यता आहे.






विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत कुठे बिघडणार गणित?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजप विरुद्ध दुसऱ्या क्रमांकावर असणारा शिवसेना शिंदे गट यांच्यात ठाणे, कोकण, परभणी, हिंगोली यासोबतच सांगली आणि सातारा या जागांवर मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळू शकतो. या जागांवर दोन्ही पक्ष आमनेसामने येऊन वाद होण्याची शक्यता आहे. मात्र या १७ जागांवर महाविकास आघाडी फक्त नावापुरती विरोधकाची भूमिका पार पाडेल. महाविकास आघाडीकडील संख्याबळ पाहता, मविआला एकाही जागावर विजय मिळवता येईल का? याबाबत शंका आहे.
संख्याबळानुसार ताकद
संख्याबळानुसार नागपूर, जळगाव, सोलापूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ याठिकाणी भाजपची चांगली ताकद आहे. त्यामुळे इथून भाजपचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर सोलापूरमधून राजा राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
तर शिवसेना शिंदे गट ठाणे, कोकण – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – रायगड या जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या जागांवर शिवसेना शिंदे गटाचं संख्याबळ अधिक आहे. मात्र इथं भाजपने दावा सांगितला तर शिवसेना शिंदे गटाची अडचण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपाचा हा पेच महायुती कसा सोडवणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुणे, सातारा – सांगली आणि आहिल्यानगरच्या जागेसाठी प्रयत्न केले जातील. अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच संख्याबळ जास्त आहे. इथं राहुरी पोटनिवडणूक न लढल्यामुळे प्राजक्त तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे.
महायुतीत संघर्ष कुठे होणार
परभणी – हिंगोलीमध्ये महायुतीत सर्वाधिक संघर्षाची चिन्हं आहेत. इथं महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे. १७ पैकी ज्या जागांवर महाविकास आघाडी जिंकू शकते, अशी एकमेव जागा म्हणून या जागेकडे पाहिलं जात आहे. इथं महायुतीत ऐकी बघायला मिळाली तर महाविकास आघाडीची वाट आणखी अवघड ठरू शकते. जिल्हापरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना- राष्ट्रवादीमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. आता विधान परिषद निवडणुकीत देखील असंच चित्र बघायला मिळू शकतं.
महायुतीतील संभाव्य जागावाटप
भाजप – ९ ते ११ जागा
शिवसेना – ३ ते ४ जागा
राष्ट्रवादी- २ जागा













