भीमाशंकरमध्ये ‘हेरिटेज टाउनशिप’ होणार; सरकारचा १७३ कोटींचा निधी पुनर्वसनासाठी मंजूर, ३६ एकर जागेत उभारणार नवी वसाहत…

0

श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी राज्य सरकारने १७३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीतून सर्व सोयीसुविधांनी युक्त असे ‘हेरिटेज टाउनशिप’ (वारसा वसाहत) उभारून गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिखर समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, वनमंत्री गणेश नाईक, आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे (व्हीसीद्वारे), मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  ऑपरेशन टायगर आधीच एकनाथ शिंदेंना राजकीय झटका बसेल का? तातडीने अमित शाहंच्या भेटीला सोबत माजी शिक्षणमंत्री उपस्थित

भीमाशंकर मंदिराच्या जवळ सध्याचे गावठाण आहे. या गावठाणाचे पुनर्वसन करताना तेथील भौगोलिक आव्हाने आणि भविष्यातील नियोजित विकास लक्षात घेऊन, मगच त्यांचे स्थलांत्तर करण्यात येणार आहे. ही नवीन वसाहत मुख्य मंदिरापासून शंभर मीटरवर विकसित केली जाणार आहे. पुनर्वसन करताना प्रत्येक ग्रामस्थाला त्याच्या सध्याच्या घराच्या आकारानुसार या वसाहतीमध्ये नवीन घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या प्रकल्पामुळे कोणीही विस्थापित होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ही वसाहत ‘हेरिटेज वसाहत’ म्हणून ओळखली जाईल. पुनर्वसन करताना मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी धार्मिक पर्यटन आणि निसर्गप्रेमींसाठी ‘इको टुरिझम’ या दोन्ही संकल्पनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दर्जेदार रस्ते, २४ तास पाणीपुरवठा, आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन आणि अखंडित वीज यांसारख्या पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले आहे.

अधिक वाचा  गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ… CNG दरवाढीचा नवा धक्का! मुंबई-पुण्यात दर किती? शहरानुसार सीएनजीचे नवे दर

मे महिन्याच्या अखेरीस या कामाच्या निविदा काढल्या जातील. जून २०२७ पर्यंत, म्हणजेच नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही डुडी म्हणाले.

भीमाशंकर गावठाणातील सुमारे १२५ कुटुंबांचे पुनर्वसन ३६ एकर जागेत करण्यात येणार आहे. सध्या गावाचे क्षेत्र ३७ हजार चौरस मीटर असून, प्रस्तावित गावाचे क्षेत्र ५२ हजार चौरस मीटर असेल. या नवीन वसाहतीत ८० टक्के घरे ५०० चौरस फुटांची असतील तर २० टक्के घरे एक हजार चौरस फुटांची असणार आहेत.

असे असेल आदर्श ग्राम प्रकल्प

  • सुमारे १२५ कुटुंबांचे
  • ३६ एकर जागेत पुनर्वसन
  • ग्रामपंचायत इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, समाजमंदिर, मध्यवर्ती सभागृह, बाजारपेठ
  • २४ तास पाणीपुरवठा होणार
  • आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन
  • अखंडित वीजपुरवठा
  • पर्यावरण संवर्धनावर भर
  • आधुनिक सुविधायुक्त परिसर
अधिक वाचा  हडपसर अवैध दारूकडे दुर्लक्ष महागात माहिती असूनही कारवाई नाही पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई