बाणेर–बालेवाडी परिसरातील वारंवार व दीर्घकालीन वीजपुरवठा खंडित होणे, पायाभूत सुविधांतील त्रुटी व ग्राहक सेवेतील गंभीर अपयशाबाबत स्मार्ट सिटीझन तर्फे बाणेरच्या आज शनिवारी ६ वाजता, अगदी शांततेचे फक्त नागरिकांचे सिग्नेट कॉर्नर बालेवाडी फाटा येथे रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्यात आले. १ मे ते १४ मे २०२६ या कालावधीत परिसरात वारंवार व दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होत होता. अनेक वेळा दुपारी अंदाजे २:१५ वाजल्यापासून अनेक तास वीजपुरवठा बंद राहिला. यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, घरून काम करणारे व्यावसायिक, विद्यार्थी तसेच अखंड वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या अत्यावश्यक सेवांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले होते.






विशेषतः एप्रिल २०२६ पासून परिसरात जवळपास दररोज वीजपुरवठा खंडित होत आहे. बहुतांश वेळा आठवड्यातून ३ दिवस २ ते ४ तास वीज जात आहे. या सततच्या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन गंभीरपणे विस्कळीत झाले आहे. विद्युत अधिनियम, 2003 च्या कलम 57 अंतर्गत औपचारिक तक्रारही दाखल करण्यात आली आहे परंतु यावर कोणतेही कारवाई झाली नाही.
वीज खंडित असताना खालील गंभीर बाबी निदर्शनास आल्या:
- वीजपुरवठा खंडित होणार असल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत माहिती रहिवाशांना देण्यात आली नाही.
- MSEDCL चे हेल्पलाईन क्रमांक, संपर्क केंद्रे व तक्रार नोंदणी व्यवस्था बराच काळ प्रतिसाद देत नव्हती किंवा उपलब्ध नव्हती.
- नंतर MSEDCL अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार:
- सर्व ३ इनकमर केबल्स एकाच वेळी निकामी झाल्या,
- तसेच बॅकफीडिंग केबल्सवर अतिरिक्त भार आल्यामुळे त्या ट्रिप झाल्या.
परिसरातील वीज वितरण यंत्रणेवर गंभीर ताण असल्याचे स्पष्ट होते. तसेच पर्यायी वीजपुरवठा व्यवस्था, बॅकअप क्षमता आणि तांत्रिक पुनरावृत्ती अपुरी असल्याचेही दिसून येते. विशेष म्हणजे, MSEDCL कडून यापूर्वी बाणेर–बालेवाडी परिसरात पायाभूत सुविधा मजबूत करणे, अतिरिक्त लोड व्यवस्थापन, फीडर विभाजन व बॅकफीडिंग सुविधा वाढविण्याबाबत सार्वजनिक घोषणा करण्यात आलेल्या होत्या. त्याने काहीही फरक पडला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांना सातत्याने खालील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, व्होल्टेजमधील तीव्र चढउतार, वीजपुरवठा पुनर्संचयित करण्यात होणारा विलंब, DP ब्लास्ट या सततच्या व्होल्टेज चढउतार व वीज खंडित होण्यामुळे माझ्या घरातील अनेक विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. विद्युत अधिनियम, 2003 च्या कलम 57 अंतर्गत निर्धारित सेवा मानके तसेच लागू MERC Standards of Performance Regulations नुसार ग्राहकांना विश्वासार्ह व अखंड वीजपुरवठा मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. समाधानकारक प्रतिसाद व प्रभावी सुधारात्मक उपाययोजना न झाल्यास, ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF), विद्युत लोकपाल, MERC तसेच इतर सक्षम प्राधिकरणांकडे कायदेशीर मार्गाने दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
विज महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे सर्व नागरिक त्रास सहन करत आहोत, शिवाय निवडून दिलेले सर्व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या व्यथेकडे दुर्लक्ष करीत आहेत. या व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी सर्व नागरिक सिग्नेट कॉर्नर, बालेवाडी फाटा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन शांततेत उत्स्फूर्त पणे पार पाडले.












