महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नगरविकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महसूल विभाग या विभागांच्या अंतर्गत निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयांची संक्षिप्त माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकर राज्य सरकारकडून या निर्णयांबाबतचा तपशील जाहीर केला जाणार आहे.






महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
– महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण (सिबीजी), २०२६ जाहीर – प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती, बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवणार. यावर्षासाठी पाचशे कोटींची तरतूद. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी होणार. (नगर विकास विभाग )
– राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार. या पदावरील शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
– सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येणार. सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार – व्यवसायाच्या संधी. (महसूल विभाग)
– राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग – २ मधून भोगवटादार वर्ग – १ मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना. याबाबतची अधिसूचना काढण्यास मान्यता. (महसूल विभाग)










